विधानसभा निवडणुकीसाठी 20 रोजी मतदान
नागपूर (Nagpur) :- राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. उमेदवार सध्या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत. आदर्श आचारसंहितेनुसार, आज संध्याकाळी सहा वाजल्यानंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेला प्रचाराचा हा रंग आज सायंकाळी थांबला.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आणि खासदार कंगना रानौत यांसारख्या दिग्गजांसोबतच कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी तसेच अभिनेते भाग्यश्री आणि मिथुन चक्रवर्ती, गोविंदा यांनीही प्रचाराच्या रणधुमाळीत सहभाग घेतला.
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेतेमंडळींनी मोठ्या सभांऐवजी बाईक रॅली आणि पत्रकार परिषद आयोजित केल्या. आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून 20 नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे जाहिर प्रचार, टीव्ही, केबल, रेडिओ, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांद्वारे मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या बाबी करण्यास बंदी आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा निकाल उमेदवारांच्या प्रचारावर आणि मतदारांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.