Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

#भाजपकडून #bjp माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान

नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद

महाराष्ट्राती विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, मतदारांना आपल्या सोबत जोडून घेण्यासाठी भाजपाकडून बुथपातळीवर नियोजन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत.भाजपने आपल्या गोटातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशानं या महत्त्वपूर्ण उपक्रमाची आखणी केली आहे. या संवादाद्वारे पंतप्रधान मोदी भाजपच्या निवडणूक रणनितीला बळकटी देतील आणि बुथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा-निर्देश देतील.

—————

BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना

प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक आठवडा उरला आहे. एकीकडे महाविकास आघाडी आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वातील महायुती मैदानात आहे. दरम्यान, आता भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवस संघ धावून आला आहे. या आठवड्यासाठी संघाने विशेष तयारी केली आहे. संघाने एक रणनिती आखली असून, याद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होणार आहे.संघाच्या रणनितीनुसार, विविध विभागातील अधिकाऱ्यांनाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विभागातील दोन अधिकाऱ्यांना एका विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे रणनीतीनुसार प्रत्येक विधानसभेत संघाचे 3 अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे तिन्ही अधिकारी भाजप आणि सर्व सहयोगी संघटनांशी उत्तम समन्वय साधण्यासाठी रणनीती तर बनवतीलच, पण बूथ स्तरावर नाराज आणि निष्क्रिय स्वयंसेवकांना एकत्र करण्याचे कामही करतील.

————

शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव?

कुणाची तोफ धडाडणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर मनसेची सभा होणार की ठाकरेंच्या शिवसेनेची सभा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली असून 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेण्यावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. मनसे पक्षाकडून महापालिकेला शिवाजी पार्क मैदान मिळावी, यासाठी आधी पत्र गेल्याने नियमानुसार आम्हाला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तर 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने हजारो लाखो शिवसैनिक राज्यभरातून शिवाजी पार्कवर येतात. त्यामुळे शिवतीर्थावर शिवसेना ठाकरे गटाला परवानगी मिळावी आणि आता इतर कुठल्याही पक्षाला परवानगी मिळू नये, अशा प्रकारची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.


 

गौतम अदानींची नवीन योजना

‘या’ क्षेत्रात करणार 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी 42 हजार कोटींची योजना आखली आहे. यानंतर टाटा आणि बिर्ला या मोठ्या गटांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षात गौतम अदानी यांनी आपला व्यवसाय वाढवला असून त्यात वैविध्यही आणले आहे. अदानी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. आधी सिमेंट, मीडिया आणि नंतर अक्षय ऊर्जा यानंतर आता गौतम अदानी आणखी एका क्षेत्रात पाऊल टाकणार आहेत. ज्यामध्ये पुढील 5 वर्षात 42 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांची या क्षेत्रातील स्पर्धा मुकेश अंबानींशी नसून टाटा आणि बिर्ला यांच्याशी असणार आहे.अदानी कोणत्या सेक्टरमध्ये 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपयांची गुतंवणूक करणार आहेत, याबाबतची माहिती पाहुयात. गौतम अदानी येत्या तीन ते पाच वर्षांत 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भारतीय धातू उद्योगात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाचा नैसर्गिक संसाधन विभाग तांबे, लोह आणि पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या खाणकाम, शुद्धीकरण आणि उत्पादनात गुंतवणूक करेल. समूह तांबे उत्पादनात 2 अब्ज डॉलर आणि इतर धातूंमध्ये 3 अब्ज डॉलर गुंतवण्याची शक्यता आहे.

————–

अमित ठाकरेंना मत का देऊ नये

संजय मोनेंच्या एका वाक्याची जोरदार चर्चा

दिग्गज अभिनेते संजय मोने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत राजपुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी एक खास पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी अमित ठाकरे यांना मत का द्यावं यासाठी 10 महत्त्वाचे मुद्दे सांगितले होते. पण विशेष लक्ष वेधून घेतलंय. अमित ठाकरेंना मत का देऊ नये यासाठी केवळ एकच कारण संजय मोने यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या कारणाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.माहीमच्या मतदारसंघातून अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात त्यांच्यासमोर शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत यांचं आव्हान आहे. राजपुत्र मैदानात असल्यामुळे माहीम मतदारसंघाकडे सगळ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे. असं असतानाच संजय मोनेंनी अमित ठाकरेंसाठी केलेल्या पोस्टमध्ये एका वाक्याने विशेष लक्ष वेधून घेतलंय.

—————-

मी अजित भाऊ हा उल्लेख टाळतेय

भर सभेत सुप्रिया सुळेंचा अजित दादांना चिमटा

अजित दामोदर गव्हाणे हेच आमदारकीचे सर्टिफिकेट घेतील यात शंका नाही. आता मी अजित भाऊ म्हणतेय पण ते म्हणताना मी अजित दामोदर गव्हाणे असा उल्लेख करायला हवा. अन्यथा काहीजण माझं भाषण ईडीट करून वापरू शकतात. म्हणून मी फक्त अजित भाऊ आमदार होतील असं म्हणाले नाही, तर आम्हाला आमचा अजित दामोदर गव्हाणे हाच आमदार हवाय, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाच्या समर्थकांना उद्देशून भर सभेत सुप्रिया सुळेंनी टोला लागवला आहे. सुप्रिया सुळे भोसरीतील शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणेंचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यावर भाष्य करत सरकारवर टीका केली.लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हतीचं, हे माझ्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. कारण सगळं तर माझ्या विरोधातचं लढाई सुरू होती. या बहिणीबाबत कोणी काय-काय केलं हे सर्वांनी पाहिलं आहेच. त्यामुळं आता लाडकी बहीण आठवलेली आहे. असा टोला ही सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला आहे.

—————-

‘सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य…’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया

काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारवर बुलडोझर कारवाईवर ताशेरे ओढले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘बुलडोझर कारवाई’च्या निर्णयाबाबत उत्तर प्रदेश सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. यात म्हटले आहे की, सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य. या दृष्टिकोनातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उत्तर प्रदेश सरकारने सांगितले की, यामुळे माफिया घटक आणि संघटित व्यावसायिक गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. कायद्याचे राज्य सर्वांना लागू होते. हा आदेश दिल्लीच्या संदर्भात असला तरी उत्तर प्रदेश सरकार त्यात सहभागी नव्हते. हा खटला जमियत उलेमा-ए-हिंद विरुद्ध उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि इतरांशी संबंधित होता.

—————-

मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी

जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही,आबीटकरांची प्रतिक्रिया

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघात प्रचार अवघा शिगेला पोहोचला आहे. प्रचार सर्वच ठिकाणी शांततेत सुरू असला, तरी राधानगरीमध्ये प्रचाराला गालबोट लागलं आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आंबिटकर यांची पोस्टर्स फाडण्यात आल्याने ऐन निवडणूक भरात आली असतानाच वादाची ठिणगी पडली आहे. मुदाळ तिट्टा आणि आणि कावणे गावाजवळ लावण्यात आलेली पोस्टर्स फाडण्यात आल्याने आमदार प्रकाश आंबिटकर आक्रमक झाले आहेत. आबिटकर यांनी पोस्टर फाडाल मात्र जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही असं म्हणत जोरदार पलटवार केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles