विकासासाठी डबल इंजिन सरकार गरजेचे
शिर्डी (Shirdi) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल विशेष जागा आहे. त्यामुळे हे राज्य पुढे नेण्यासाठी व येथे सुरू असलेले प्रकल्प आणखी गतीने होण्यासाठी महायुतीचे डबल इंजिन सरकार गरजेचे आहे, असा आशावाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda ) यांनी शिर्डीत व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शिडी येथे बुधवारी झालेल्या सभेत मंत्री नड्डा बोलत होते.
यावेळी उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कमलाकर कोते, राजेंद्र गोंदकर, सुरेंद्र थोरात आदींसह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिर्डीच्या या पवित्र भूमीत साईबाबांनी ‘सबका मालिक एक’चा संदेश दिला. त्याचप्रमाणे ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा देत मोदी सरकार गतीने पुढे चालले आहे. स्वातंत्र्यापासून जेवढे सत्ताधारी आले त्यांनी भ्रष्टाचारातून स्वतःची घरे भरण्याचे काम केले; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशाला विकासाच्या वाटेने नेले. कोरोनानंतर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान आदी देश आर्थिक गर्तेत सापडली असताना एकमेव भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे साऱ्या जगाने पाहिले. त्यावेळी जगाचा विकासदर मंदावत असताना भारताचा विकासदर वाढत होता. त्यामुळेच जगात भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या कार्यकाळात ११व्या स्थानावरून ५व्या स्थानावर आली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणून तुम्ही मोदींना साथ दिली तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मंत्री नड्डा यांनी व्यक्त केला.