प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक आठवडा उरला आहे. एकीकडे महाविकास आघाडी आहे, तर दुसरीकडे भाजपच्या (BJP) नेतृत्वातील महायुती मैदानात आहे. दरम्यान, आता भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवस संघ धावून आला आहे. या आठवड्यासाठी संघाने विशेष तयारी केली आहे. संघाने एक रणनिती आखली असून, याद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जैन आणि मारवाडी मतदारांनी NOTA वर अधिक भर दिला होता, त्यामुळे संघाचे अधिकारी या समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या मुल्यांकनानुसार यावेळी जातीय राजकारणाला गती मिळू नये, यासाठी संघ विशेष काळजी घेत आहे. यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध जाती-समुदायातील प्रमुख व्यक्तींशी सातत्याने संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
संघाच्या (RSS) रणनितीनुसार, विविध विभागातील अधिकाऱ्यांनाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विभागातील दोन अधिकाऱ्यांना एका विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे रणनीतीनुसार प्रत्येक विधानसभेत संघाचे 3 अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे तिन्ही अधिकारी भाजप आणि सर्व सहयोगी संघटनांशी उत्तम समन्वय साधण्यासाठी रणनीती तर बनवतीलच, पण बूथ स्तरावर नाराज आणि निष्क्रिय स्वयंसेवकांना एकत्र करण्याचे कामही करतील.