नेत्यांसह कार्यकर्ते आपापल्या प्रचारात व्यस्त
अमरावती (Amaravati) 11 नोव्हेंबर :- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून अधिकारी व सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. आजी- माजी आमदार, माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसह ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आपापल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात गुंतले आहेत. या परिस्थितीत जनतेच्या समस्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असून, लोकांची कामेही रखडत असल्याची चर्चा होत आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात महायुती, महाविकास आघाडीतील उमेदवार व इतर उमेदवार मैदानात आहे. मात्र, मतदारसंघात भेडसावत असलेले शेतकऱ्यांसह बेरोजगारी आदी अनेक प्रश्न या निवडणुकीत हरवले आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट असल्याने अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने तालुक्यासह गावांत अनेक प्रलंबित असलेली कामे अजूनही जशीच्या तशीच आहे. शहरात ठिकठिकाणी अर्धवट पडलेली कामे तसेच सोयाबीन, कापसाचे पडलेले भाव व रासायनिक खताचे वाढलेले भाव तसेच जीवनावश्यक वस्तूच्या व वाढलेल्या किमती या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून प्रचाराला अधिक महत्त्व दिले जात आहे. देशात युवकांसमोर बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. त्यावर कुणीच बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांवर संकटावर संकटे येत आहे. त्यांच्या मदतीला सध्या कुणीच धावून येताना दिसत नाही. त्यामुळे प्रचारातून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न गायब होताना दिसत आहेत.
ऐन दुष्काळात जनता हवालदिल झाली आहे. मात्र, सध्या जनतेच्या प्रश्नांवर कोणीच बोलायला तयार नाही. भावनिक मुद्द्याचे राजकारण करीत टीकाटिप्पणी केली जात आहे. या चिखलफेकीमुळे कार्यकर्त्यांची तेवढी करमणूक होत आहे. माध्यमातून आगपाखड होत आहे. मात्र, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. कामेही रखडली… २० नोव्हेंबरला निवडणूक आहे. २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार असल्याने आचारसंहितेच्या काळात नवीन कामांना मंजुरी मिळणार नाही. मात्र, मंजूर झालेली कामे करता येतात. मात्र, अनेक ठिकाणी कामे बंद असल्याने रोष व्यक्त केला जात आहे,