चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांसह महायुतीतील बंडखोरांना इशारा
पंढरपूर (Pandharpur) :- सध्या विरोधक आमच्याशी गनिमी काव्याने लढत असून आम्ही त्या गनिमी काव्याचे उत्तर गनिमी काव्यानेच देणार आहोत. यावेळी मात्र आम्ही बेसावध नसून पूर्णपणे सावध आहोत. परिणामी शेवटपर्यंत उमेदवारी बाबत कोण काय भूमिका घेतंय, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. आज महाविकास आघाडीतील सर्व जागांची घोषणा होईल. मात्र महायुतीत जो कोणी वेगळी भूमिका घेतंय, त्याबाबतही आम्ही आता गंभीर आहोत. अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांबरोबर बंडखोरीच्या तयारीत असणाऱ्या महायुतीतील नेत्यांना इशारा दिलाय.
महायुतीकडे उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यामध्ये काही नाराज मंडळी असून काही अति नाराज आहेत. जे अति नाराज आहेत ते दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी दाखल करीत आहेत आणि जे कमी नाराज आहेत त्यांची समजूत आम्ही चार नोव्हेंबरपर्यंत काढू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला
विरोधकांना केवळ मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचे पडले असून शरद पवार (Sharad Pawar) गॅंगमधील प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी आहे . त्यांना सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढेच साधायचा आहे. असा टोला लगावताना सध्या त्यांचे नाईंटी-नाईंटी सुरू असल्याची खिल्ली ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडवली. ज्या जागांवर महायुतीचे अद्याप उमेदवार जाहीर करायचे आहेत त्या ठिकाणी आज दिवसभरात उमेदवार जाहीर होतील, असा दावाही त्यांनी केला. कोण किती जागा लढवणार या आकडेवारीत आम्ही जात नसून जो उमेदवार निवडून येतो त्यालाच उमेदवारी महायुतीकडून दिली जात आहे. यंदा सत्ताही महायुतीची येणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या तिकिटासाठी रस्सीखेच होती. परिचारक हे तुतारी हातात घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना बंडखोरी शांत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी परिचारक समर्थक आणि अवताडे यांची एकत्रित बैठक घडवून आणली. बंद खोलीत झालेल्या या बैठकीचा शेवट गोड झाला असला तरी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या चेहऱ्यावरची नाराजी मात्र दूर झालेली दिसत नव्हती. ती स्थिती परिचारक समर्थकात होती. गेले दोन महिने प्रशांत परिचारक हे पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात गावोगावी फिरून मतदारांचा कानोसा घेत होते