मुंबई (Mumbai) :- विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत सुक्ष्म तणाव निर्माण झाला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. बाळासाहेब थोरात हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतान महाविकास आघाडीत जागावाटपावरुन कोणताही तणाव नसल्याचे स्पष्ट केले आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत बिघाडी होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला सतावत होता. त्यामुळे आता मविआच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी राऊत-पटोले यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात आणि अनिल देसाई यांना पुढे करण्यात आले आहे का,असा प्रश्न थोरात यांना विचारण्यात आला.
यावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले की, आमच्यापैकी कोणीतरी एक नेता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटणार होता. मात्र, रमेश चेन्नीथला यांनी मला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जायला सांगितले. शरद पवार आणि माझी चर्चा चांगली झाली. आता काही थोड्या जागांवर निर्णय बाकी आहे. यामधून लवकरच मार्ग निघेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.