अति पावसामुळे पाणीच पाणी
पुणे (Pune) :- शनिवारपासूनच मुंबई, ठाणे पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. याचाच परिणाम पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील मेट्रो ट्रेनच्या उद्धाटन सोहळ्यासाठी आणि सोबतच 22600 कोटी रुपयांच्या विविध योजनांच्या उद्धाटनांसाठी आणि लोकार्पणासाठी पंतप्रधान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत येणं अपेक्षित होतं. पण, पावसाची एकंदर स्थिती आणि हवामानाचा अंदाज पाहता त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला.
पंतप्रधान (Nrendra Modi) दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकात येणार होते. तिथून ते मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. स्वारगेटवरून गाडीने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार होती. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचाही समावेश होता. सभेनंतर फर्ग्यूसन महाविद्यालय परिसरात त्यांच्या रोड शोचेही आयोजन करण्यात आले होते.
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झालं आहे. बुधवारी पुणे, मुंबईसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) अक्षरशा झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने दाणादाण उडाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी आजही वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत