Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

देवेंद्रजी आमच्या मनातील मुख्यमंत्री | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

देवेंद्रजी आमच्या मनातील मुख्यमंत्री

गिरीश महाजन यांचं स्प्ष्ट वक्तव्य

भाजपमध्ये एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजी होतील. पक्षश्रेष्ठीना सर्व अधिकार आहेत. पण आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपचा असेल तर तो म्हणजे देवेंद्रजी असतील असं वक्तव्य राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. येत्या पंधरा ते वीस दिवसात आचारसंहिता लागेल आणि महायुतीचा विजय होईल असंही ते म्हणाले.गिरीश महाजन यांनी नांदेडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. आम्ही महायुतीकडून निवडणूक लढवत आहोत सगळे आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आमचा मुख्यमंत्री होईल असं कोणी बोलू नये तो निर्णय महायुतीचा असेल असंही गिरीश महाजन म्हणाले.

————-

राहुल यांच्या विरोधात थेट स्पीच

खरगेंचे मोदींना पत्र

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी राहुल गांधींविरोधात द्वेषपूर्ण भाषणावर चिंता व्यक्त केली. भाजपचे नेते राहुल यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे खरगे यांनी मोदींना सांगितले. हे भविष्यासाठी घातक आहे. अशा नेत्यांवर अंकुश ठेवा आणि त्यांच्यावर कारवाई करा. राहुल यांना सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे काँग्रेस कार्यकर्ते त्रस्त असल्याचे खरगे म्हणाले. मला आशा आहे की राहुल यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडणार नाही. 11 सप्टेंबर रोजी दिल्ली भाजप नेते तरविंदर सिंह यांनी राहुल यांची अवस्था त्यांच्या आजीसारखी होईल, असे म्हटले होते. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंह बिट्टू यांनी राहुल यांना देशाचा नंबर-1 दहशतवादी म्हटले होते.

————

बाप्पांनी बुद्धी द्यावी

देवेंद्र फडणवीस यांची गणरायाकडे मागणी

गणपती बाप्पा ने आम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी, अशी टिपण्णी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर त्यांच्या सागर या बंगल्यावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम जलकुंड येथे गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पाला निरोप देताना त्यांनी सद्बुद्धी द्यावी त्यासोबतच विरोधकांवर टिप्पणी देखील केलेली आहे.

———-

केजरीवाल यांनी LG ना राजीनामा सोपवला

आतिशी आणि सर्व मंत्री हजर

अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी संध्याकाळी 4.45 वाजता लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. आतिशी यांच्यासह सर्व मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी नवीन मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. त्यात दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्‍यान, केजरीवाल याांनी राजीनामा दिल्‍यानंतर आपचे नेते गोपाल राय यांनी आतिशी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून दुजोरा दिला. गोपाल राय यांनी म्हटले आहे की, “अरविंद केजरीवाल यांनी आपला राजीनामा दिल्लीच्या एलजीकडे सुपूर्द केला आहे. सर्व आमदारांनी एकत्रितपणे अतिशी यांना नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आतिशी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

————–

भारताने पाचव्यांदा जिंकली एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी

चीनला होम ग्राउंडवर हरवलं

एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 चा फायनल सामना हा भारत विरुद्ध चीन यांच्यात पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान चीनला धूळ चारून पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या जुगराज सिंहने गोल केला त्यामुळे भारताने हा अतितटीचा सामना 1-0 ने जिंकला. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे.

———–

राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा

रामदास आठवलेंची मागणी

राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधींना शोभत नाही”, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी केली आहे. ते पालघर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. रामदास आठवले म्हणाले, अजित पवारांमुळे महायुतीच कोणतही नुकसान नाही . लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा. राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही. मी असल्यामुळे महायुतीने राज ठाकरे यांना घेऊ नये, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं.

————

डॉक्टरांची मागणी मान्य

ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय

आरजी कर रुग्णालयात घडलेल्या घटनेपासून ज्युनिअर्स डॉक्टर संपावर आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉक्टरांनी काही मागण्या केल्या. त्यातील तीन महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.. या बैठकीत पाच मागण्या ममता बॅनर्जींकडे करण्यात आल्या. त्यानंतर ममता बॅनर्जी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, कोलकाताचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. आयपीएस मनोज कुमार वर्मा यांची कोलकाता पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरा महत्त्वाचा निर्णय ममता बॅनर्जी यांच्या सरकारने घेतला असून, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य सेवा संचालक यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोलकाताचे पोलीस आयुक्त आयपीएस विनीत गोयल यांची पश्चिम बंगालचे एसटीएफचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे.

————

गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव

भाजप नेत्यानं लावली बोली

तेलंगणातील बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात मंगळवारी 30.1 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली गेली. येतील गणेश उत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे, हा लिलाव दरवर्षी बाळापूर गणेश मूर्ती विसर्जनासाठी निघताना होतो. यावेली सर्वाधिक बोली भाजप नेते कोलानू शंकर रेड्डी यांनी लावली.शहराच्या इतर भागातही विविध गणपती मंदिरांत अशा प्रकारचा लिलाव करण्यात आला. बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी भाग घेतला होता. महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये बाळापूर मंदिरातील लाडूचा लिलाव 27 लाख रुपयांना झाला होता. दरम्यान, रंगारेड्डी जिल्ह्यातील बंदलागुडा नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या कीर्ती रिचमंड विला येथील आणखी एका लाडूचा लिलावात 1.87 कोटी रुपयांची बोलील लागली होती. ही बोली गेल्यावेळच्या बोलीच्या तुलनेत 67 लाख रुपयांनी अधिक राहिली.

———-

कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

मराठा समाजाची आरक्षणाबाबत सरकारने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील सहकाऱ्यांची भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मराठा समाजाचा वापर करून घेणाऱ्यांना जाब विचारणार की नाही, जरांगे पाटील यांनी सरकारला सहकार्य करावे आम्ही कोणाचीही दिशाभूल करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे.

————

ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू

चितोड गावात शोककळा

राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असून मुबंई, पुण्यासह राज्यभरात गोवागोवी गणपती बाप्पांना निरोप देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी, गावात ट्रॅक्टर, ट्रॉली, ढोलीबाजा, मिरवणुकीतील ढोलपथकांची रेलचेल दिसून येत आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते एकत्र जमत बाप्पांच्या मिरवणुकीची जय्यत तयारी करत आहेत. मात्र, जिल्ह्यातील धुळे शहराजवळ असलेल्या चितोड गावांमध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वीच मोठी दुर्घटना घडली. गावातील एका ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकांच्या उत्साहावर दु:खाचं सावट पसरलं असून गावात शोककळा निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

———–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles