चंद्रपूर – शेतात पडलेल्या वीजवाहक तारांचा स्पर्श झाल्यामुळे 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) गावात घडली आहे. ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत अशी या घटनेत बळी गेलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, गणेशपूर (मेंडकी) येथील सदर शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतात काम करत होते. काम करताना सकाळी 11 च्या सुमारास त्यांचा स्पर्श वीजवाहक तारांना झाला. विजेचा प्रवाह सुरु होता त्यामुळे या दुर्घटनेत 4 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 2 शेतकरी गंभीर जखमी झाले.
ही घटना रानडुक्करांच्या बंदोबस्तासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या वीजवाहक तारांमुळे घडली किंवा काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस त्या अंगानेही या घटनेची चौकशी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत वाहक तारा शेतात पडल्या होत्या. त्या तशाच राहिल्यामुळे ही दुर्घटना घडली असा दावाही या प्रकरणी केला जात आहे. वीज केंद्राचे अधिकारी, पोलिस प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरु आहे.