जालना:- मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली आहे. आगामी १६ सप्टेंबरपासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या एक दिवस आधी, ते उपोषण सुरू करणार आहेत. पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मागणी केली आहे, त्यासाठी फेब्रुवारीपासून समाज वाट पाहत आहे. सरकारने या संदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने पाटील यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पाटील यांनी मराठा समाजातील तरुणांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असा संदेश दिला आहे. मी शहीद होण्यास तयार आहे,असे ते म्हणाले, आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी नेत्यांवर आरोप केला की, त्यांना मराठा आरक्षणाशी काहीही देणे-घेणे नाही, फक्त त्यांच्या पक्षाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी ते धडपडत आहेत.
यापूर्वी, अंतरवाली सराटीत पाटील यांनी उपोषण सोडताना सरकारला सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुदत दिली होती. परंतु, आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतला आहे. पाटील यांनी विरोधी नेत्यांवर टीका केली, विशेषतः छगन भुजबळ यांच्यावर, आणि उपोषणाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर फडणवीस यांच्या दबावाचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठयांच्या विरोधात एक टीम तयार केली आहे, असे पाटील म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरही लढणार आहेत. त्यांनी मराठा आंदोलनाच्या विरोधात उभ्या असलेल्या नेत्यांवर त्यांनी हल्ला चढवला.