नागपूर (Nagpur) :- महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली. मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पोटात दुखले. त्यांनी वडपल्लीवार नावाच्या व्यक्तीला पुढे करून कोर्टात केस दाखल केली. हे वडपल्लीवार नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते. विकास ठाकरे यांच्यासाठीही त्यांनी काम केले. काँग्रेसचे नेते सुनिक केदार यांच्या ते जवळचे आहेत, असा आरोप उच्च न्यायालयातील या याचिकेचा कागद दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) केला. रेशीमबाग परिसरात आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महायुतीमधील अनेक ज्येष्ठ नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, कोणी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही. महाविकास आघाडी सरकारला महायुतीच्या सर्व योजना बंद करायच्या आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यास ते लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी असलेल्या सर्व योजना बंद करतील, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील महिलांना लखपती दीदी बनविण्याचे टार्गेट डोळ्यापुढे आहे.
केंद्रात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे सरकार महिलांच्या विकासासाठी काम करीत आहे. राज्यात महायुतीचे सरकार महिलांना सक्षम करीत आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार आल्यास महिलांच्या विकासाच्या कामाचा वेग दुपटीने वाढेल. महिलांच्या सुरक्षेसाठी महायुती सरकार वचनबद्ध आहे. प्रसंगी महिलांकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नेतृत्वात नागपूरसह विदर्भाचा झपाट्याने विकास होत आहे. एक हजार कोटी रुपये खर्च करीत गरीबांसाठी आधुनिक आरोग्य सुविधा असलेले हॉस्पीटल उभारले गेले आहे. अनेक प्रकल्प नागपुरात येत आहेत. मेट्रो आणि रस्त्याची कामे वेगाने पूर्ण झाली आहे. अत्याधुनिक शिक्षण देणाऱ्या संस्थाही विदर्भात आल्या आहे. लाडक्या बहिणींसह महायुती सरकारने भावांचाही विचार केल्याबद्दल फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे (Eknath Shinde) आभार मानले. 50 हजार लोकांना पट्टेवाटप करण्यात आले आहे. देशात सर्वांत महत्वाचा निर्णय केवळ महाराष्ट्रातच घेण्यात आला आहे.
महायुती सरकार समाजातील सर्व घटकांचा सर्वसमावेशक विचार करीत आहे. त्यामुळे नागरिकांचा आशीर्वाद आता महायुतीला हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही मोठी संपत्ती असू शकत नाही. त्यामुळे ही अमूल्य संपत्ती महायुतीला हवी आहे. हा आशीर्वाद महायुतीला मिळाल्यास महाराष्ट्राच्या विकासाचा वेग चौपटीने वाढवू अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.