वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार
भारत आज आपल्या स्वातंत्र्याचा 78 वा स्वतंत्र दिन साजरा करीत आहे. देशभरात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली.
देशाला 11 व्यांदा संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले की, 60 वर्षांनंतर लागोपाठ तिसऱ्यांदा देशाची सेवा कऱण्याची संधी दिली. लोकांचे आशीर्वाद व्यर्थ जाणार नाहीत. प्रत्येकाची सेवा, प्रत्येक कुटुंबाची सेवा, प्रत्येक क्षेत्राची सेवा करत देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहचवण्याचा संदेश मिळाला आहे. या लाल किल्ल्यावरून मी देशवासियांना नमन करतो
सबका साथ सबका विकास हा मंत्र साकारतोय
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हम सबका साथ सबका विकास हा मंत्र आम्ही साकारत आहोत, आम्हाला मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवनमान कळले आहे. त्यांच्या आयुष्यात सरकारी हस्तक्षेप कमी करण्याची व्यवस्था केली जात आहे. छोट्या छोट्या गरजांकडेही आपण लक्ष देतो. गरीब मातेला रडून झोपावे लागू नये यासाठी वीज, पाणी, गॅस आणि उपचाराची सोय केली जात आहे. सबका साथ सबका विकास हा मंत्र आपण साकारत आहोत.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या माता-भगिनींवर होत असलेल्या अत्याचारामुळे जनतेत संताप आहे, ही देखील चिंतेची बाब आहे. आम्हाला ते जाणवत आहे. महिलांवरील गुन्ह्यांचा त्वरीत तपास करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. महिलांवरील अत्याचाराच्या घटना चर्चेत राहिल्या की, पाप करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांना फाशी झाली पाहिजे. ही भीती निर्माण करणे आवश्यक आहे.
भारताची दिशा योग्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर आपण प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी निर्माण केल्या, आधारभूत सुविधांवर काम केले, गरजेनुसार काम केले तर बदल दिसून येतील. आज दरडोई उत्पन्न दुप्पट झाले आहे, भारताची निर्यात वाढत आहे, परकीय चलनाचा साठा दुप्पट झाला आहे. भारताची दिशा योग्य आहे, वेग वेगवान आहे. आपल्या स्वप्नात शक्ती आहे. आम्हाला आशा आणि शक्यता हवी आहे.
वन नेशन वन इलेक्शनसाठी सर्वांनी पुढे यावे
एक देश एक निवडणूक हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावेए असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
संशोधन इनोव्हेशनवर 1 लाख कोटी खर्च करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आपल्याला भर देण्याची गरज आहे. चंद्रयान मिशनच्या यशानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाप्रति विद्यार्थ्यांची रुची वाढली. यालाच योग्य दिशेला आणि पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. सरकारकडून रिसर्चसाठी करण्यात येणारी मदत वाढवण्यात आली. नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची व्यवस्था केली. अर्थसंकल्पात संशोधन आणि इनोव्हेशनवर 1 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे वचन घेत आहे, असे मोदी म्हणाले.
जागतिक संस्थांचा भारतावरील विश्वास वाढला
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपला देश आकांक्षांनी भरलेला आहे. प्रत्येक क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यावर आमचा फोकस आहे. त्यासाठी लागणाऱ्या बदलासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर काम करूया. नागरिकांच्या मूलभूत सुविधा बळकट केल्या पाहिजेत, त्यामुळेच समाज आकांक्षांनी भरलेला आहे. देशातील लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. जागतिक संस्थांचा भारतावरील विश्वास वाढला आहे.
न्यायावर लक्ष केंद्रित
पंतप्रधान मोदी म्हणाले की, छोट्या-छोट्या चुकांसाठी तुरुंगात जाणारे कायदे आम्ही रद्द केले – 1500 हून अधिक कायदे आम्ही रद्द केले, छोट्याशा चुकीसाठी तुरुंगात जाण्याचे कायदे रद्द केले. आज आपण स्वातंत्र्याच्या वारशाच्या अभिमानाबद्दल बोलत आहोत. शतकानुशतके अस्तित्वात असलेले जुने गुन्हेगारी कायदे रद्द करण्यात आले आहेत. आम्ही शिक्षेवर नव्हे तर न्यायावर लक्ष केंद्रित केले.
आज महिला स्वावलंबी होतायत, ही सामाजिक बदलाची गॅरंटी
गेल्य दहा वर्षात दहा कोटी महिला वुमन सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. याचा आम्हाला गर्व आहे. सामान्य कुटुंबातील दहा कोटी महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होत आहेत. जेव्हा महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होतात तेव्हा कुंटुंबात ती महिला निर्णय प्रक्रियेचा भाग होते. ही एक मोठ्या सामाजिक बदलाची गॅरंटी आहे. भारतातील सीईओ जगभरात नावाजले जात आहे. दुसरीकडे एक कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आतापर्यंत 9 लाख कोटी रुपये महिला स्वयंसहायता बचत गटाला मिळाले आहेत. या मदतीमुळे महिला अनेक काम करत आहेत.
भारतात बनवलेले गेम जगभरात खेळले गेले पाहिजेत
भारताकडे गेमिंगचा मोठा वारसा आहे, भारतातील मुले, तरुण, AI व्यावसायिकांना गेमिंगच्या जगाचे नेतृत्व करू द्या. भारतात बनवलेले खेळ जगभर खेळले गेले पाहिजेत.
स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्पेस सेक्टर एक भविष्य आहे. महत्त्वाचा पैलू आहे. स्पेस सेक्टरमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत. आम्ही दूरगामी विचार करुन स्पेस सेक्टर मजबूत करत आहोत. आज प्रायवेट रॉकेट लॉन्च होत आहेत. उपग्रह सोडले जात आहेत. आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या. त्याबरोबर दोन गोष्टी अजून झाल्या. त्यामुळे विकासाला गती मिळाली. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच निर्माण आणि सामन्य माणसासाठी इज ऑफ लिव्हिंगवर भर दिला आहे.
मेडिकलच्या 75 हजार जागा वाढवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संशोधनावर सातत्यपूर्ण भर, रिसर्च फाऊंडेशन हे काम करत आहे. संशोधनासाठी आम्ही बजेटमध्ये एक लाख कोटी रुपये दिले आहेत. आपल्या देशातील मुले वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. आपण अशा देशांमध्ये जात आहोत ज्यांचा विचार करून आश्चर्य वाटेल. विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता 10 वर्षात मेडिकलच्या जागांची संख्या 1 लाख झाली आहे. येत्या पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 75 हजार नवीन जागा निर्माण होणार आहेत.
भारतीय मानके आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रत्येक राज्याला सांगायचे आहे की असे नियम बनवा की गुंतवणूकदार त्यांच्याकडे येतील. कारखाना उभारला तर तो त्यांच्या राज्यात उभारावा आणि केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये. आपल्या राज्याच्या सुधारणेची ही संधी आहे. भारतीय मानके आणि आंतरराष्ट्रीय मानके बनवायला हवीत. डिझाइनच्या क्षेत्रात आपण जगाला खूप काही देऊ शकतो.
बँकिंग क्षेत्रात सुधारणा
बँकिंग क्षेत्रात ज्या सुधारणा झाल्या. त्याआधी बँकिंग क्षेत्राची काय स्थिती होती, याची कल्पना करा. आम्ही बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. आज आपल्या बँकांनी जगातील सर्वात मजबूत बँकांमध्ये आपले स्थान निश्चित केलं असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
पायाभूत सुविधांवर दशकभरात काम- पंतप्रधान
गेल्या दशकात रस्ते, रेल्वे, महामार्ग, शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, अमृत सरोवर, दोन लाख पंचायतींना ऑप्टिकल फायबर, चार कोटी पक्की घरे अशा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.आपण पायाभूत सुविधांवर काम केले.
देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत
आमच्या नजरेत राष्ट्र सर्वप्रथम आहे. आपला देश महान व्हावा हाच उद्देश समोर ठेवून आम्ही काम करतो. बँकिंग क्षेत्राचा आज मोठा विकास झाला. अगोदर या क्षेत्राचा विकास हो नव्हता. आपल्या बँका संकटात होत्या. बँकिंग क्षेत्र मजबूत करण्यासाठी आम्ही अनेक बदल केले. जेव्हा बँक मजूबत असते तेव्हा अर्थव्यवस्थाही मजबूत होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशातील लोकांचे मन आत्मविश्वासाने भरलेले
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना काळ कोणीही विसरू शकत नाही. आम्ही या काळात देशात सर्वाधिक वेगाने लसीकरण केले. भारतात अगोदर दहशतवादी येऊन अनेकांना मारून जायचे. आता देशाची सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करते. यामुळे देशातील युवकांची छाती अभिमानाने फुगते. देशातील लोकांचे मन आज गर्वाने आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे.
सरकारला पत्र लिहून तुमच्या अडचणी सांगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, युवक, प्राध्यापकांना आवाहन करतो की तुम्हाला येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा. या अडचणींवर असलेल्या उपयांबद्दल सांगा. कोणतेही कारण नसताना उभ्या राहिलेल्या या अडचणींविषयी सरकारला पत्राद्वारे सांगा. देशातील प्रत्येक सरकार संवेदनशील आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्था असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार तुम्ही लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जाईल, याचा मला विश्वास आहे.
विकसित भारतासाठी मागवलेल्या सूचनांचा उल्लेख
विकसित भारत 2047 साठी आम्ही देशवासीयांकडून सूचना मागवल्या होत्या. आम्हाला मिळालेल्या अनेक सूचना या नागरिकांची स्वप्ने आणि आकांक्षा दर्शवतात. काही लोकांनी भारताला कौशल्याचे भांडवल बनवण्याचा सल्ला दिला तर काहींनी भारताला उत्पादन केंद्र बनवायला हवे आणि देश आत्मनिर्भर झाला पाहिजे असे सांगितले.
शासन आणि न्याय व्यवस्थेतील सुधारणा, ग्रीनफिल्ड शहरांचे बांधकाम, क्षमता वाढवणे, भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक, या नागरिकांच्या आकांक्षा आहेत. जेव्हा देशातील लोकांची अशी मोठी स्वप्ने असतात, तेव्हा ते आपला आत्मविश्वास नव्या उंचीवर घेऊन जातात आणि आपण अधिक दृढनिश्चयी बनतो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तेव्हाच्या लोकसंख्येनुसार देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 40 कोटी लोकांनी स्वातंत्र्याचा लढा लढला. त्यांनी सामर्थ्य दाखवलं. त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं. लढत राहिले. त्यांच्या मुखी वंदे मातरम् हा एकच स्वर होता. आम्हाला गर्व आहे की, आमच्यात त्यांचेच रक्त आहे. फक्त 40 कोटी लोकांनी जगातील महासत्तेला उलथून लावले होते.
देशात आधुनिक यंत्रणा उभी राहतेय
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज माझ्या देशातील तरुणाला हळूहळू चालायचं नाही. आज माझ्या देशातील तरुणाला थेट भरारी घ्यायची आहे. भारताचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पाना घेऊन पुढे गेलो तर 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. एमएसएमई, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रात नवी आणि आधुनिक यंत्रणा उभी राहात आहे. आपण आपल्या देशातील परिस्थितीनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. आमच्या नव्या धोरणामुळे प्रत्येक क्षेत्रात या क्षेत्रांना तकद मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नैसर्गिक संकटांमुळे आपली चिंता वाढत आहे. या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. संपत्तीचे नुकसान झालेले आहे. या सर्वांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. या संकटाच्या काळात देश त्यांच्यासोबत उभा आहे. आपला देश शेकडो वर्षांपासून गुलाम होता. हा काळ संघर्षाचा होता. शेतकरी, महिला, वृद्ध स्वातंत्र्याचा लढा लढत राहिले. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रमाच्या आधीही आदिवासी क्षेत्रात स्वातंत्र्याचा लढा लढण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या वर्षी आणि गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेकांनी आपले कुटुंब आणि मालमत्ता गमावली आहे. मी आज त्या सर्वांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात म्हणाले की, आजचा हा शुभ मुहूर्त आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरण पावलेल्या आणि आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यप्रेमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सण आहे. हा देश, आम्ही त्यांचे ऋणी आहोत.