कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग
मुंबई (Mumbai) :- मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेले आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई ते कोकणचा प्रवास खडतर असतानाच राज्य सरकारने (State Government) मुंबई-गोवा अंतर कमी करण्यासाठी कोकण एक्स्प्रेस हा प्रकल्प हाती घेतला आहे.
एकूण 22 गावांतून हा प्रकल्प जाणार असून यामुळं मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत पूर्ण होणार आहे. सध्या रस्तेमार्गे मुंबई-गोवा प्रवासासाठी 12 तास लागतात मात्र कोकण एक्स्प्रेसवेमुळं प्रवाशांना जलद प्रवास करता येणार आहे. तसंच या महामार्गावर एकूण 14 ठिकाणांहून वाहनांना प्रवेश करता येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करतांना पावसाळ्यात नेहमीच कशेडी घाटातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. येथील वळणावळणाचा घाट आणि महामार्गावर दरड माती खाली येणे या घटना पावसाळ्यात घडत असतात त्यामुळे अपघातही होतात. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी या कामाची पाहणी देखील केली होती. कशेडी बोगद्याची एक मार्गीका या महिनाअखेर खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार होणार आहे.