बांगलादेशच्या PM हसीनांचा राजीनामा
भारतात झाल्या दाखल
बांगलादेशमध्ये आरक्षणासाठी उफाळलेला हिंसाचार शमविण्यासाठी केलेल्या गोळीबारात 100 हून अधिक लोक ठार झाल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आरक्षणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी 5 ऑगस्ट रोजी राजीनामा दिला. लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी ढाका येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, आता लष्कर अंतरिम सरकार स्थापन करेल.दुसरीकडे, ढाकामध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. लष्करप्रमुखांनी लोकांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणू. श्रद्धा ठेवा. सुमारे 4 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. राजधानीत ठिकठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान निवासस्थान सोडले आहे. वृत्तसंस्था एएफपीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पंतप्रधान ढाका सोडून काही सुरक्षित ठिकाणी गेल्या आहेत. त्यांची बहीण रेहानाही त्यांच्यासोबत आहे.त्याचवेळी, हसीना लष्करी हेलिकॉप्टरने भारतात पोहोचल्याचा दावा केला जात आहे.
जनता दरबारात दीड हजारहून अधिक समस्या
नितीन गडकरींचे आयुक्तांना निर्देश
नितीन गडकरीचा जनता दरबार यंदा नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला. नागपुरातील हजारो नागरिक आपल्या समस्या व अडचणींची निवेदने घेऊन याठिकाणी आले होते . महापालिकेतील कॉन्फरन्स हॉलमध्ये गडकरींनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. समस्या सांगितली की लगेच संबंधित विभागातील आणि झोनमधील अधिकान्याला गडकरी जाब विचारत होते. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर सर्वांसमोर त्यांच्या खास शैलीत गडकरी खडसावतही होते. लोकांची कामे केली नाही तर तुम्हाला नोकरी गमवावी लागेल, असेही गडकरींनी काही अधिकाऱ्याऱ्यांना म्हटले.
———
रोजगाराच्या संधी वाढत असल्याचा विश्वास
‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची माहिती
देशामध्ये खादी आणि हातमागावरील वस्त्रांची विक्री वाढत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये सांगितले. यामुळे देशामध्ये रोजगाराच्या संधी वाढत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, खादी ग्रामोद्याोगच्या व्यवसायाने प्रथमच १.५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.
———
राज्यात I.N.D.I.A. आघाडीचे समीकरण बदलणार
आम आदमी पक्षाचा स्वबळाचा नारा
आम आदमी पक्ष राज्यातील विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील 36 जागा लढण्याची तयारी आम आदमी पक्षाने केली असल्याची माहिती, पक्षाच्या नेत्या प्रिती शर्मा यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्षाचा समावेश करण्यात आला होता. दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर भाजपविरोधात लढण्यासाठी पक्षाने काँग्रेससोबत युती केली. दिल्लीच्या सात जागांपैकी आम आदमी पक्षाने चार तर काँग्रेसने तीन जागा लढविल्या होत्या. मात्र, येथील सातही जागांवर भाजप उमेदवार निवडून आले. या मोठ्या अपयशानंतर लोकसभा निवडणुक निकालाच्या तिसऱ्याच दिवशी ‘आप’ने काँग्रेसला टाटा, बाय बाय करत एकट्यानेच पुढे जाण्याची घोषणा केली. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची जाहीर घोषणा केली.
———-
आज काल मी सगळ्यांचाच लाडका
देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधक आरोप करत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांनीच मला खोट्या केसमध्ये अडकवलं त्यासाठी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांनाही मदतीला घेतलं. तसंच उद्धव ठाकरेंनीही त्यांच्यावर टीका केली. या सगळ्या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. अभिमन्यू चक्रव्युहात अडकला होता त्याला बाहेर येता नव्हतं मी तसा नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
———-
मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाचे पालन करा
चंद्रकांत पाटील यांनी दिले आदेश
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी याबद्दल शासन निर्णय जारी करण्यात आला. मात्र तरीही महाविद्यालयाकडून या निर्णयाचे पालन केले जात नव्हते. आता याबद्दल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. मुलींना मोफत शिक्षणाच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयाची शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द केली जाणार आहे, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
——-
मराठ्यांना ओबीसीत जाण्याची गरज नाही
बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यावर ठाम आहेत. इतकंच नाहीतर सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटमवर अल्टिमेट दिल्याचेही पाहायला मिळत आहे. मात्र सरकारने आरक्षणाबाबत कोणताही ठाम निर्णय घेतला नाही. अशातच आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केले आहेआरक्षणाचा मुद्दा हा वास्तविक लहान प्रश्न होता पण राजकीय काही नेत्यांनी आरक्षणाचा मुद्दा किंवा प्रश्न फार मोठा केला आहे. त्यावर पडदा पडणं आवश्यक आहे, असेही मत त्यांनी मांडले. पुढे बच्चू कडू असेही म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि ते कोर्टात टिकलं तर मराठ्यांना ओबीसी समाजात जाण्याची गरज नाही, असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलं आहे.
———–
मला धमकी देऊ नका नाहीतर…
जरांगेंचा नारायण राणेंना निर्वाणीचा इशारा
राज्याच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकायम राहिलेत. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रमुख नेते पुढे सरसावतात. यावेळी आणखी एक भाजपचे ज्येष्ठ नेते थेट जरांगेंच्या निशाण्यावर आहे. फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका, असे म्हणत मनोज जरांगेंनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला धमकी देऊ नका, मी गोरगरिबांसाठी काम करतो. राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस यांच ऐकून ते मला बोलत आहेत, तुम्ही देवेंद्र फडणवीसची सुपारी घेतली. मी देवेंद्र फडणवीसला मोजत नाही. मराठा समाजाने चांगले चांगले पाया खाली चिरडले आहेत, तुम्ही कोण आहात? असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांना दिला आहे.