काही दिवसांपूर्वी ‘कल्की-2898-एडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या कल्पनापटात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थाम्याची भूमिका साकारली आहे. त्यासोबतच शाहिद कपूरचा अश्वत्थामा हा चित्रपट निर्माणाधिन आहे. चंदेरी जगतातील या कथानकांच्या माध्यमातून महाभारतात खलनायक ठरवल्या गेलेला अश्वत्थामा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. भारतात वृत्तवाहिन्या सुरू झाल्यानंतर जवळपास प्रत्येक हिंदी वृत्तवाहिन्यांनी मध्यप्रदेशातील नर्मदेचा काठ आणि अशिरगड किल्ल्यावरील मंदिरात शंकराच्या पुजेला येणारा अश्वत्थामा यावर स्टोरी केलीय. त्यामुळे महाभारताला 5 हजार वर्षे लोटल्यावरही कौरव-पांडव आणि श्रीकृष्णानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेले पात्र म्हणजे अश्वत्थामा असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. वर्तमानात वयाची चाळीशी उलटलेल्या पिढीला अश्वत्थाम्याची पहिली ओळख त्यांच्या घरातील ज्येष्ठांकडून उच्चारल्या जाणाऱ्या सप्तचिरंजीवांच्या स्मरणातून झाली. कुटुंबातील धार्मिक पगडा असलेले आजी-आजोबा नातवंडांकडून हा सप्तचिरंजीवींचा उल्लेख असलेला श्लोक हमखास वदवून घ्यायचे.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।
या श्लोकाच्या भावार्थानुसार सात चिरंजीव आणि आठवे ऋणी मार्डण्डेय यांचे स्मरण करणारा निरोगी आणि शतायुषी होतो. त्यामुळे जो स्वतः जखमी आहे असा माणूस इतरांना निरोगी कसे ठेवू शकतो असा सहज तर्क मनात येतो. त्यामुळे अश्वत्थामाच्या कपाळावर भळभळणारी जखम ही कल्पना असल्याचे अधोरेखित होते. कारण श्रुती कथेनुसार जर तो जखमी असता तर श्लोक लिहीणाऱ्याने या श्लोकात त्याचा समावेश केला नसता हा पहिला तर्कसंगत विचार मनात डोकावून जातो. गोवर्धन येथील क्रियायोग गुरू शैलेंद्र शर्मा आपल्या दांडग्या अभ्यासाच्या बळावर अश्वत्थाम्याची निराळीच कथा सांगतात.
विविध धर्मग्रंथाच्या अध्ययनानंतर गुरूदेव शर्मा यांनी असा निष्कर्ष काढला की, अश्वत्थामा केवळ सप्तचिरंजीव नसून तो शापमुक्त झाला आहे. तसेच त्याचा आधुनिक सप्तर्षींमध्ये समावेश असून भविष्यातील व्यास देखील आहे. महाभारतातील अश्वत्थाम्याचे चरित्र ही प्रतिशोध आणि प्रायश्चित्ताची कथा आहे. महाभारताच्या शल्य पर्वात दिलेल्या माहितीनुसार द्रोणाचार्य आणि कृपी या दाम्पत्याने पुत्रप्राप्तीसाठी हिमालयाच्या पायथ्याशी (वर्तमानातील उत्तराखंड) भगवान शंकराची तपश्चर्या केली होती. द्रोणाचार्यांनी शंकरासारखा तेजस्वी आणि बलशाली पुत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार जन्मजात कपाळावर दिव्य मणी घेऊन द्रोणाचार्यांच्या घरी पुत्राचा जन्म झाला. जन्माला आल्याबरोबर घोड्याप्रमाणे आवाज करीत रडणारा म्हणून मुलाचे नाव अश्वत्थामा ठेवण्यात आले.
शिवपुराणात अश्वत्थाम्याला भगवान शंकराचा अवतार म्हंटले आहे. स्वतःभोवती गुढत्व घेऊन वावरणारा महाभारतातील अश्वत्थामा हे पात्र जीवनातील करूण, रौद्र, बिभत्स हे 3 रस वाचणाऱ्याच्या मनात उत्पन्न करतो. अश्वत्थामा लहान असताना त्याने आपली आई कृपी हिला दुधाची मागणी करणे आणि दूध नसल्यामुळे आईने त्याला पिठात पाणी टाकून पाजणे हा कारूण्यभाव घेऊन अश्वत्थामा आपल्याला महाभारतात पहिल्यांदा भेटतो. त्यानंतर कपाळावर जन्मजात दिव्य मणी असल्यामुळे सुमारे 18 दिवस चाललेल्या युद्धात अपराजित योध्दा बनून पराक्रम गाजवताना त्याचे रौद्र रूप जगाला दिसले. तर युद्धाच्या अखेरच्या क्षणी द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या आणि उत्तरेच्या गर्भावर दिव्यस्त्र सोडणारा अश्वत्थामा बिभत्स आणि अमानवीय वाटतो. परंतु, त्याच्या कथेचा जवळून अभ्यास केल्यास अश्वत्थाम्याने जे काही केले तो एका मुलाने वडिलांच्या अनितीने केलेल्या हत्येचा प्रतिशोध होता हे आपल्या लक्षात येते.
महाभारताच्या युद्धात गुरु द्रोणाचार्य कौरवांच्या वतीने लढत होते. युद्धादरम्यान पांडवांनी अश्वत्थामा मरण पावल्याची खोटी अफवा पसरवली. हे ऐकून गुरु द्रोणाचार्य दुःखाने भरले आणि संधी मिळताच द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न याने निःशस्त्र द्रोणाचार्यांची हत्या केली. या कपटाने केलेल्या हत्येमुळे अश्वत्थामा कमालीचा संतप्त झाला होता. अशात भीमाने दुर्योधनाला गदायुद्धांत मृतप्राय केल्याने युद्धाची धुरा अश्वत्थाम्याकडे आली होती. याप्रसंगाचा उल्लेख महाभारताच्या सौप्तिक पर्वात आलेला आहे.
सौप्तिक पर्वात केलेल्या उल्लेखानुसार अश्वत्थामा, कृतवर्मा (नारायणी सैन्याचा सेनापती) आणि कृपाचार्य हे तिघे रात्री झाडाखाली विश्राम करीत असताना तिथे आलेल्या घुबडाने कावळ्याच्या पिल्लांना मारून खाल्ल्याचे त्यांनी पाहिले. यावरून त्यांच्या मनात झोपलेल्या पांडव सैन्यावर हल्ला करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य यांनी पांडव शिबिरावर हल्ला करण्याची योजना आखली. महाभारताच्या सौप्तिक पर्वात केलेल्या वर्णनानुसार जेव्हा अश्वत्थामा पांडव शिबिरात पोहचला तेव्हा त्याने पाहिले की साक्षात भगवान शंकर त्या शिबिराचे संरक्षक आहेत. याठिकाणी शंकराचे वर्णन खूप वेगळे करण्यात आलेय. व्याघ्रांबर धारण केलेल्या महाकाल शिवाचे अनेक नेत्र आणि भुजा आहेत.
तसेच त्यांच्या तेजातून अनेक विष्णू प्रगट झालेले असून संपूर्ण आकाश विष्णूमय झालेय. हे दृष्य पाहून काही काळ थबकलेल्या अश्वत्थाम्याने शंकरांशी युद्ध करण्याचा निश्चय केला. परंतु, त्याची सर्व शस्त्रास्त्रे महाकाल शिवाच्या शरीरात जाऊन सामावली आणि दिसेनासी झालीत. या पराभवाने खचलेल्या अश्वत्थाम्याने आत्मदाह करण्याचा निर्णय घेतला. आपल्या योगशक्तीने त्याने अग्नि प्रगट करून त्यात उडी घेण्याचा प्रयत्न करताच साक्षात शंकरांनी प्रगट होऊन त्याला थांबवले. श्रीकृष्णावरील स्नेहामुळे आपण आतापर्यंत पांडव शिबिराचे रक्षक बनलो होतो. परंतु, आता यांची वेळ आली आहे असा म्हणत शंकरांनी अश्वत्थाम्याच्या शरीरात प्रवेश केला. भगवान शंकराने कुणाच्या शरीरात प्रवेश केला असा दावा करणारे हे एकमेव उदाहरण आहे. या घटनेपूर्वी आणि यानंतर अशाप्रकारचा उल्लेख कुठल्याही साहित्यात आढळत नाही. शंकराने शरीरात प्रवेश करताच आवेशात आलेल्या अश्वत्थाम्याने पांडव शिबिरावर हल्ला चढवला.
शंकराने दिलेला खड्ग घेऊन दिसेल त्याला कापत सुटलेल्या अश्वत्थाम्याने बुक्क्या मारून धृष्टद्युम्नाचा वध केला. अनितीने द्रोणाचार्यांची हत्या केल्यामुळे तू शस्त्राने मारण्यायोग्य नाहीस असे सांगत त्याने धृष्टद्युम्नाला ठार केले. याच युद्धांत त्याने पांडव समजून द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या केली. महाभारताच्या सौप्तिक पर्वात या नरसंहाराचे केलेले वर्णन अतिशय भीतीदायक आणि सारगर्भित आहे. सौप्तिक पर्वात नमूद वर्णनानुसार “अश्वत्थामा पांडव शिबिरात आला तेव्हा तिथे वादळापूर्वीची शांतता होती आणि अश्वत्थामा शिबिरातून गेला तेव्हा तिथे स्मशान शांतता होती.” परंतु, त्या रात्री पांडव मात्र सुरक्षित राहिले. भगवान कृष्ण आपल्यासोबत सात्यकी आणि पांडवांना सोबत घेऊन आधीच गंगेकाठी आरामासाठी निघून गेले होते. पांडव आणि कृष्ण सकाळी शिबिरात परतल्यानंतर त्यांनी अश्वत्थाम्याचा शोध घेतला आणि तिथे ब्रह्मास्त्राचा केलेला प्रयोग आणि उत्तरेच्या गर्भावर झालेला दिव्यास्त्राचा वार ही कथा सर्वांनाच ठाऊक आहे. त्यावेळी श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याच्या कपाळावरील मणी काढून घेत त्याला जखमी अवस्थेत 3 हजार वर्षांपर्यंत एकाकी भटकण्याचा शाप दिला. हे गृहित धरले तरी महाभारताला आज 5 हजार वर्ष पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे अश्वत्थामा सुमारे 2 हजार वर्षांपूर्वीच शापमुक्त झाला असावा हे मान्य करावे लागले. भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या शापानंतर काय झाले हे जाणून घ्यायचे असल्यास स्कंध पुराणाचा संदर्भ घ्यावा लागेल. स्कंद पुराणानुसार श्रीकृष्णाने शाप दिल्यानंतर अश्वत्थामा कृष्णद्वपायन व्यासांकडे गेला. त्याने व्यासांना विनंती केली की, या शापापासून मुक्तीचा उपाय सांगा. त्यावेळी व्यासांनी त्याला रामेश्वरम येथे जाऊन कार्तिक स्नान करून श्रीरामाने स्थापन केलेल्या रामेश्वरम शिवलिंगाची महिनाभर उपासना करण्याचा उपाय सांगितला. त्यानुसार धनुषकोटी येथे जाऊन अश्वत्थाम्याने शंकराची उपासना केली. कार्तिक महिन्याच्या अखेरच्या दिवशी अश्वत्थाम्याने शिवतांडव स्तोत्राचे पठन करत शंकराची आराधना केली. त्यानंतर भगवान शंकराने त्याला शापमुक्त केले. या मंदिरात एक शिलालेख लागला असून “इथे अश्वत्थामा शापमुक्त झाला होता” असे लिहीले आहे. त्यानंतर अश्वत्थामा ब्रह्मर्षी बनला.
पुराणातील या कथेनंतर अश्वत्थाम्याची कथा आपल्याला वृंदावनात सापडते. ब्रजभूमीत मथुरेजवळ शेरगड नावाचे गाव आहे. याठिकाणी भारद्वाज गोत्राचे रेकॉर्ड किपर्स राहतात. त्यांचा संदर्भ हा सर्वोच्च न्यायालयातही ग्राह्य धरला जातो. शेरगडमधील भारद्वाज गोत्राच्या रेकॉर्डनुसार शापमुक्तीनंतर अश्वत्थाम्याने 17 विवाह केले होते. भारद्वाज गोत्र आजघडीला ब्राम्हणांचे सर्वात मोठे गोत्र आहे. यानंतर विष्णू पुराणाचा संदर्भ घेतला असता असा उल्लेख आढळतो की, अश्वत्थामा केवळ सप्त-चिरींजीवीच नव्हे तर सप्तर्षी देखील आहे. तसेच भविष्यातील व्यास म्हणूनही अश्वत्थाम्याचा उल्लेख आढळतो.
भगवान विष्णुंच्या कल्की अवताराच्या वेळी जुन्या सप्तर्षींऐवजी नवीन सप्तर्षी असतील यात अश्वत्थामा, कृपाचार्य, परशुराम, विश्वामित्र, गालव, मार्कंण्डेय आणि कृष्णद्वैपायन यांचा नवे सप्तर्षी म्हणून उल्लेख आहे. अश्वत्थामा शापित होऊन अजूनही तेल मागतो या भ्रमात जगण्याऐवजी महाभारताचे सौप्तिक पर्व, स्कध पुराण, शिव पुराण, विष्णू पुराण आणि भारद्वाज गोत्राचा इतिहास या गोष्टींचे अध्ययन केल्यास अश्वत्थामा शापमुक्त असून भविष्यातील व्यास असल्याची माहिती मिळते. हे संदर्भ तपासल्यानंतर आपले शंकानिरसन होऊन सत्य पुढे आणण्यास मदत मिळेल असा योगगुरू शैलेंद्र शर्मांचा दावा आहे.