भारतासाठी जिंकलं तिसरं पदक
पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेमध्ये भारताच्या स्वप्निल कुसळेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्याने कांस्यपदक पटकावलं आहे. हे ऑलम्पिकमधील भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. या आधी भारताने नेमबाजीमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. विशेष म्हणजे भारताला पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये तीन मेडल मिळाले आहेत.
महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं.
भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.