वायनाडमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत 165 जणांचा मृत्यू
केरळच्या 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 165 वर पोहोचली आहे. 116 रूग्णालयात आहेत, तर 220 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुंडक्काई, चुरामाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात सोमवारी रात्री उशिरा भूस्खलन झाले. घरे, पूल, रस्ते, वाहने वाहून गेली. आर्मी, एअरफोर्स, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक बाधित भागात बचावकार्यात गुंतले आहेत. रात्री उशिरापर्यंत ढिगाऱ्याखालून १ हजार जणांची सुटका करण्यात आली होती. रात्री बचावकार्य थांबवण्यात आले, जे सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले.
मंगळवारी 225 लष्करी जवानांना कन्नूरहून वायनाडला पाठवण्यात आले. बचावकार्यासाठी हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले होते, मात्र पावसामुळे त्यांना कोझिकोडला परतावे लागले. सततच्या पावसामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आपला वायनाड दौरा रद्द केला आहे. बुधवारी ते येथे पीडितांना भेटण्यासाठी जात होते. बुधवारी हवामान खात्याने वायनाड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसह 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे, तर एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्यांमध्ये पिवळा अलर्ट जारी केला आहे.
————–
तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच
मनसे ची मिटकरी यांना उघड धमकी
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला. या कारणामुळे मनसैनिक संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणानंतर आता मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरींना उघड धमकी दिली. “तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच, तुला कुत्र्यासारखा मारणार”, असे मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे म्हणाले.
——-
2 ऑगस्टपासून सावनेरला ठिय्या आंदोलन
आशिष देशमुखांचा केदारावर आरोप
दिलीप वळसे पाटील हे सुनील केदार यांना वाचवित असल्याचा आरोप भाजपाचे नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी केला. तातडीने सुनावणी न झाल्यास २ ऑगस्टपासून सावनेरला ठिय्या आंदोलनाचा इशाराही देशमुख यांनी दिला. दोन महिन्यांत केदार यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करून शेतकरी आणि खातेदारांना पैसे वाटप करण्याची मागणी निवेदनात केली.
दिलीप वळसे पाटील आणि सुनील केदार हे जुने मित्र आहेत. त्यांचे हित संबंध असल्याने सोमवारी होणारी सुनावणी पुढे ढकलली. माजी मंत्री व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुनील केदार यांना वाचविण्याचा प्रयत्न राज्याच्या सहकार खात्याकडून असल्याच्या आरोपामुळे सत्ताधारी महायुतीमधील भाजप व अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे. देशमुख यांच्यासह नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवेदन देण्यात आले.
============
मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅटट्रीक करणार!
पुन्हा उतरणार स्पर्धेत
भारतीय महिला नेमबाज मनु भाकरने दोन पदकं जिंकत 124 वर्षे जुना विक्रम मोडून काढला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत तिने दोन पदकं जिंकली आहेत. मनु भाकरने 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक आणि मिक्स्ड प्रकारात पदकाची कमाई केली आहे. दोन्ही ठिकाणी मनुच्या खात्यात कांस्य पदक पडले . आता मनु या स्पर्धेत पदकांची हॅटट्रीक करण्यासाठी उतरणार आहे. तिसरं पदक जिंकण्यात यश आलं तर अशी भारतीय ऑलिम्पिक इतिहासात महारेकॉर्ड होईल. हा विक्रम मोडून काढणं कोणत्याही खेळाडूला शक्य होणं कठीण आहे. भारतीय ऑलिम्पिक इतिहासात 1900 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून नॉर्मन प्रिचर्डने दोन रजत पदक जिंकले होते. त्यानंतर मनु भाकरने दोन पदकं जिंकत पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.आता 124 वर्षांचा हा विक्रम मोडीत काढण्याची संधी मनु भाकरकडे आहे. 3 ऑगस्टला मनु भाकर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. तेव्हा तिच्याकडून आणखी एका पदकाची अपेक्षा आहे.
——-
गोवा राज्यात दारू पिण्यावर बंदी घालावी
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विधानसभेत यांची मागणी
विकसित गोव्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने राज्यात दारू पिण्यावर बंदी घालावी. मात्र गोव्यात मद्याचे उत्पादन केले जावू शकते, अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विधानसभेत अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी केली. राज्यात सध्या रस्ते अपघात वाढत आहेत. या अपघातांना मद्यपान कारण ठरत आहे. अनेक प्रकरणांमध्येच तसेच दिसून येत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज असून सरकारने दखल घेण्याची मागणी केली. आमदार शेट म्हणाले, की मद्यपानामुळे अपघात वाढत आहेत ते टाळण्यासाठी तसेच विकसित गोवाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात दारू पिण्यावर बंदी घालण्याची गरज आहे. सरकारने हा बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा. मात्र तसे करतानाच गोव्यात मद्याच्या उत्पादनावर बंदी घालू नये. मद्य उत्पादन सुरुच ठेवावे. गोव्यात उत्पादन केल्या जाणाऱ्या मद्याची निर्यात अन्य राज्यात करावी. गोव्यात मद्यपानावर नियंत्रण हवे, असेही ते म्हणाले.