पहिल्या नोकरीत केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा निर्णय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला. या अर्थसंकल्पात देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी तीन नव्या योजनांबाबत संसदेत माहिती दिली. या योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. महिला, तरुण, गरीब आणि बळीराजा यांच्यासंदर्भात या बजेटमध्ये अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली असून रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी सरकारने अधिकची तरतूद केली आहे. रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित 5 योजनांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात येत आहे. या योजनांतून 4.1 कोटी लोकांना रोजगार आणि कौशल्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे, अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
विषमुक्त शेतीसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. शेती संशोधनासह विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे. देशातील 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा मोठा फायदा होणार आहे. त्यासाठीची घोषणा करण्यात आली आहे. 5 राज्यांमध्ये किसान क्रेडीट कार्ड वाटप करण्यावर भर देण्यात येत आहे.
महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जातील. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाईल. विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी क्षेत्र आणि हैदराबाद-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील ओरवाकल क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिला जाईल.अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
पीएम आवास योजनेअंतर्गत शहरी भाग १ कोटी मध्यमवर्ग, गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणारत्यासाठी १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे . त्याचाच एक भाग म्हणून केंद्राकडून पुढच्या पाच वर्षांत २.२ लाख कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.
———-
नितीश कुमार आणि चंद्राबाबूंची बल्लेबल्ले
दोन राज्यांना रेड कार्पेट
केंद्र सरकारच्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेशला भरभरून आर्थिक रसद देण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या राज्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
या दोन्ही राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. आंध्रप्रदेशाला अतिरिक्त 15 हजार कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
‘या महिन्याच्या अखेरपर्यंत विकेट पाडणार’
वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी
शिवसेना ठाकरे गटाचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनसेच्या कार्यकर्त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप वसंत मोरे यांच्याकडून करण्यात आला आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्याने वसंत मोरे यांच्या भाच्याला फोनवरुन वसंत मोरे यांना मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वसंत मोरे यांचा भाचा प्रतिक कोडितकर आणि कथित मनसे कार्यकर्त्याच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
————
पुणे ससूनमध्ये डॉक्टराकडून धक्कादायक प्रकार
पहाटेच्या अंधारात डॉक्टर असं काही करायचे
ससून रुग्णालयात काय चालले आहे? असा प्रश्न पडला आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, पुण्यातील पोर्श कारमधील अल्पवयीन मुलाचा बनावट रिपोर्ट देण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर ससूनमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. ससूनमधील डॉक्टर रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यांना निर्जनस्थळी सोडून येत होतो. डॉक्टरी पेशाला कलंक लावण्याचा लाजीरवाणा प्रकार ससून रुग्णालयात घडला आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेने भांडाफोड केला आहे. तसेच येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
———
लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांची खासदारकी धोक्यात?
जात वैधता प्रमाणपत्रावर न्यायालयात याचिका दाखल
लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकिल योगेश उदगीरकर यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. लोकसभेचा निकाल लागून आज 46 वा दिवस आहे. 45 दिवसांची हायकोर्टाची इलेक्शन पीटीशन दाखल करण्याची मुदत होती, ती काल संपलेली आहे. लातूरचे निवडून आलेले उमेदवार काळगे यांच्याविरोधात आम्ही पर्वा रीट पीटीशन दाखल केली आहे. आपण त्यांच्याविरोधात दोन केसेस दाखल केलेल्या आहेत. आपण त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला चॅलेंज केलेलं आहे. दुसरं म्हणजे इलेक्शन पीटीशनही आपण दाखल केलेली आहे, असं योगेश उदगीरकर म्हणाले.
———–
एका चुकीमुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ खोळंबली
तब्बल 25 मिनिटे सेवा रखडली
मुंबईत लोकलने दररोज लाखो नागरीक प्रवास करतात. यामध्ये विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यावसायिक, महिला विविध घटकांचा समावेश आहे. मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पण अनेकदा ही लाईफलाईन मंदावते. काही वेळा तांत्रिक कारणाने या लाईफलाईनचा वेग मंदावतो. तर काही वेळा प्रवाशांमुळेदेखील लोकल वाहतुकीवर परिणाम पडतो. पण प्रवाशांमुळे लोकल खोळंबली तर रेल्वे कायद्यानुसार संबंधित प्रवाशांवर कारवाईदेखील होते. अशीच एक कारवाई नुकतीच एका 19 वर्षीय तरुणावर करण्यात आली आहे. एका तरुणाला चर्चगेट रेल्वे स्थानकावर केलेली चूक चांगली भोवली आहे. त्याच्या एका चुकीमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वे तब्बल 25 मिनिटे खोळंबली होती. त्यामुळे या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.