प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा
राज्यात शांतता नांदावी, ओबीसींचे आरक्षण कायम रहावे, ही प्रमुख मागणी करत आज मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. येत्या 25 जुलैपासून ही यात्रा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आरक्षणाचा वाद पेटला असताना मराठा आणि ओसीबी नेते आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला इशारा देत समाजाला आवाहन केलं आहे. त्यामुळे, आरक्षणाचा वाद नेमका कसा सुटणार, या वादावर मार्ग कसा निघणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच, आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याचं म्हटलं.
————-
गरोदर महिलांना मिळणार 6 हजार रुपये
सरकारची अभिनव योजना
केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महिला सक्षमीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे सरकारतर्फे विशेषत: महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशातच केंद्र सरकारकडून देशातील गरोदर महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकार 2017 पासून पंतप्रधान मातृत्व वंदना योजना राबवत आहे. या योजनेतंर्गत गरोदर महिलांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
———–
अविमुक्तेश्वरनंद यांचे मातोश्रीवर आदरातिथ्य
शंकराचार्यच्या भेटीनंतर ठाकरे वि भाजपचं राजकारण पेटलं!
शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठाला सोहळ्याला विरोध केला होता. राम मंदिर पूर्ण झाले नसताना प्राणप्रतिष्ठा करत आहेत, असा आरोप शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला होता. आता हेच अविमुक्तेश्वरनंद पुन्हा एकदा चर्चेत आलेत आहेत. याला कारण त्यांनी मातोश्रीवर जात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी नुसती भेटच घेतली नाही तर त्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगलीय.
———–
‘त्या’ कारणामुळेच शरद पवारांनी आरक्षणाबाबत काहीच सुचवलं नसेल
भुजबळांच्या भेटीनंतर बबनराव तायवडेंचा अंदाज
शरद पवारांकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काही तोडगा राहिला असता तर त्यांनी तो या आधीच सुचवला असता. मुळातच या प्रकरणात काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळेच पवारांनी आजवर काही सूचना केल्या नसाव्या, असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे. काल ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत या प्रकरणात आपण मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्या मुद्द्याशी संबंधित प्रश्न विचारल्यावर तायवाडे यांनी हे उत्तर दिले आहे.
———
अजित पवार 60 पेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता
वाद नको म्हणून आताच सर्व्हे करणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कंबर कसली असून आगामी निवडणुकीत 60 पेक्षा जास्त जागा पक्ष लढवू शकतो अशी शक्यता पक्षातील वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जागांवर सर्व्हे केला जाणार असून योग्य उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येतंय.
————
खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी
पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ
पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत होते. आता वाढता वाद लक्षात घेता त्यांची महाराष्ट्रातील नियुक्ती रद्द केली आहे. पूजा खेडकर यांनी दिव्यांग कोट्यातून नोकरी मिळवली आहे. पण आयएएस परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी सहा वेळा वैद्यकीय पडताळणी वेगवेगळ्या कारणांने पुढे ढकलली आहे.पोस्टिंग झाली तरी उमेदवार हा २ वर्षाच्या प्रोबेशन पीरेडवर असतो. त्यामुळे या काळात त्याची नोकरी जाऊ शकते.आता जर पूजा खेडकर यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळाली असेल किंवा वैद्यकीय पडताळणी दरम्यान त्या दिव्यांग असल्याचं सिद्ध झाले नाही तर त्यांना ही नोकरी गमवावी लागू शकते. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
——–
नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा
प्रकाश आंबेडकर यांची मागणी
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनानंतर सरकारकडून कुणबी नोंदींचा शोध घेतला जातोय. सरकारकडून नेमण्यात आलेली समिती कुणबी नोंदी शोधण्यात व्यस्त आहे. या नोंदी शोधल्यानंतर संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे. पण सरकारकडून स्वत:हून ज्यांना प्रमाणपत्र दिले जात आहेत त्यांच्या नोंदी रद्द कराव्यात, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
——–
र हातात पिस्तूल घेत रील बनवण्याचा प्रताप भोवला
संभाजीनगरात 5 जणांना अटक
सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काहीतरी स्टंट किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत असून असाच एक स्टंट तरूणांना चांगलाच भोवलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर हातात पिस्तूल घेत 10-12 तरुणांना रील करण्याचा प्रताप त्यांना चांगलाच भोवलाय. सर्वसामान्य नागरिकांचे मनात भीती आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 5 जणांना पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.
——-
वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात!
चालक- वाहकावर निलंबनाची कारवाई
विठ्ठल भेटीच्या ओढीनं लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. आज संध्याकाळपर्यंत राज्यभरातून सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होतील. तर काही गावांतून वारकरी बसनं पंढरपूरकडे निघाले आहेत. अशातच वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे निघालेल्या बसचा अपघात भीषण अपघात झाला होता. वर्ध्यातून पंढरपूरकडे निघालेल्या बसला हा अपघात झाला होता. या भीषण अपघातात सुदैवानं कुठलीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, 45 वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवत असल्यामुळे हा भीषण अपघात घडला. एवढंच नाहीतर, चालकासोबत वाहकही मद्यधुंद असल्याचं वारकऱ्यांना आढळून आलं. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत, अपघाताची चौकशी सुरू केली आहे.