चिखलाने प्रवाशांची गैरसोय
नागपूर (Nagpur) :- नागपूर मधील मोरभवन बस स्थानकाची दुरवस्था चिंतेचा विषय बनली आहे. सध्या पावसाळ्यात, सर्वत्र चिखल असल्याने प्रवाशांना बस मध्ये उतरताना आणि चढताना मोठी गैरसोय होत आहे. चिखल आणि पाण्यामुळे अनेक प्रवासी पडून जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.
महानगरपालिकेची बस सेवा शहरातील अनेक नागरिकांसाठी दैनंदिन प्रवासाचा मुख्य आधार आहे. या बसेस मोरभवन परिसरात मुख्य बस स्थानकाच्या पाठीमागे केली भागामध्ये उभे राहतात.
पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होतो, ज्यामुळे ई-बसेस देखील चिखलमय होत आहेत. हे नागरी सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत “स्मार्ट सिटी” म्हणून विकसित होत असलेल्या शहराच्या प्रतिमेला तडा देत आहे.
नागरिकांमध्ये बस स्थानकाच्या दुरवस्थेमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या नागपुरात अशा प्रकारची परिस्थिती असणे हे नागरिकांना लाजिरवाणे वाटत आहे.
एकिकडे नागपूर स्मार्ट सिटी (Nagpur Smart City) बनण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे शहर बस स्थानकाची दुरवस्था कायम राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ प्रवास मिळणे आवश्यक आहे. बस स्थानकात योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागतो.