शंभुराज देसाई यांचं आरक्षणाबाबत महत्वाचं विधान
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेली डेडलाईन संपायला अवघे काही तास उरले आहेत. असं असतानाच मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा यांच्याकडे दोन महिन्यांची वेळ आम्ही मागितली होती. परंतु एकच महिन्यांचा कालावधी त्यांनी दिला. एक महिन्यात त्यांना आम्ही भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातूनमार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दोन-तीन गोष्टी महत्त्वाच्या मांडल्या होत्या. त्यामध्ये सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यासाठी आणि हैदराबाद गॅझेट या दोन्ही बाबतीत सर्वपक्षीय बैठक मागच्या चार दिवसात मुख्यमंत्र्यांनी घेतली. दुर्दैवानं महाविकास आघाडीने त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांचं त्याबाबतीत काय म्हणणं आहे हे आम्हाला कळू शकलं नाही. बहिष्कार टाकला म्हणून आम्ही काय हातावर हात ठेवून बसलेलो नाही, असंही देसाई यांनी म्हटलं आहे.
मार्ग काढण्याचा प्रयत्न करू- देसाई
रोजच्या रोज आम्ही आढावा घेत आहोत. बैठका घेत आहोत. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आग्रह जो मनोज जरांगे पाटील यांचा आहे. यासाठी आमच्या 11 अधिकाऱ्यांची टीम गेल्या चार दिवसांपासून तेलंगणा सरकारकडे गेलेली आहे. काल ती टीम परत आलेली आहे. मात्र त्यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही. सोमवारी त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे. त्याबाबतीत पण आम्ही सकारात्मक आहोत. शिंदेसाहेबांनी जो शब्द दिलेला आहे. त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू
सगळे सोयरे संदर्भात ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलेला आहे. आठ लाखापेक्षा जास्त ऑब्जेक्शन हरकती आलेल्या आहेत. त्यानंतर सुद्धा कालच्या बैठकीत याबाबतीत लीगल ओपेनियेन कायदेशीर पद्धतीने लोकांनी दिलेले आहेत. त्या सगळ्या बाबतीतली छाननी आमच्या विभागामार्फत सुरू आहे.