राज्यात मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. किनारपट्टीवर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उद्यापासून पुढील तीन दिवस हवामान विभागाने किनारपट्टीसह पुणे, सातारा जिल्ह्यांना नारंगी इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला पिवळा इशारा देण्यात आला असून, तिथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
शनिवार कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात तर रविवार आणि सोमवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शनिवार, रविवार आणि सोमवारी काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. शनिवारी संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावासाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच जळगाव जिल्ह्यात हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. रविवारी आणि सोमवारी संपूर्ण विदर्भासह, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. खानदेशातील काही भागात हलक्या सरी पडतील, असाही अंदाज आहे.