विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटली
प्रकाश आंबेडकरांनी तोफ डागली
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारलीये. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपच्या 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण काँग्रेसची ८ मतं फुटली आहेत. शिवाय ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महायुतीतील पक्षांची मतं फोडण्यात अपयश आले आहे. दरम्यान, निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केलाय. प्रकाश आंबेडकरांनी ट्वीट करत काँग्रेसवर टीका केली आहे.
—————-
जयंत पाटलांचा ठरवून पराभव
आशिष शेलारांचा ठाकरेंवर प्रहार!
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवारांचा पराभव झाला. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
————-
समान नागरी कायदा राज्य सरकारने लागू करावा
केंद्राची नवी भूमिका?
गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी समान नागरी कायद्याची चर्चा होते. केंद्रातील भाजपाच्या नेतृत्त्वातील सरकार देशभरात समान नगरी कायदा लागू करण्याच्या समर्थनार्थ आहे. पण विरोधकांकडून याला विरोध केला जातो. लवकरच हा कायदा लागू केला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सांगितलेले आहे. दरम्यान, याच समान नागरी कायद्याविषयी आता नवी माहिती समोर येत आहे. हा कायदा राज्यपातळीवरच लागू केला जावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याचे म्हटले जात आहे.
—————–
नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान
मतदारांना धमकावून मिळवला विजय
भाजपचे नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी दाखल केली आहे. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला. नारायण राणेंचा 47858 मतांनी विजय झाला. मात्र, राणेंचा हा विजय कपटनीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
————–
निवडणुकीनंतर पंतप्रधानआज मुंबईत येणार
विविध विकास कामांचे करणार लोकार्पण
लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी होणार आहे. त्यादरम्यान पंतप्रधान मोदी मुंबईला कोट्यवधी रुपयांची प्रकल्पांचे आणि बोगद्याचे उद्घाटनही करतील. लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरील नवीन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करतील. तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. तसेच घोषणा होऊन नऊ वर्ष रेंगाळलेल्या ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक वेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे. आता लोकसभा निवडणुका पार पडल्या असल्या तरी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्या दृष्टीनेच पंतप्रधान सतत महाराष्ट्राचे दौरे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
————
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका
देवेंद्र फडणवीसांची कळी खुलली
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवलाय. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे. राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करुन दाखवलाय. दरम्यान , निवडणुकीत यश मिळवल्यानंतर एबीपी माझाने पहिली प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले. कोणतेही भाष्य न करता देवेंद्र फडणवीस यांनी विजयी थंब दाखवला आणि सहकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
————–
तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो
कपिल पाटील यांची पोस्ट व्हायरल,
व्यासंगी आणि अभ्यासू आमदार म्हणून शिक्षक मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या कपिल पाटील यांनी अखेर त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली. मुंबई शिक्षक मतदारसंघात धनलक्ष्मी आणि धनदांडग्यांनी कहर केल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. आता समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आता तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो, अशी भावनिक साद घातली आहे. त्यातच त्यांनी महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे..
————-
मुंबईत निकाल, परळीत गुलाल;
पंकजा मुंडेंची बोलकी प्रतिक्रिया
भाजपने विधानपरिषद निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडेंनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आला असून आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकांत त्यांच्यावर विजयाचा गुलाल पडल आहे. संसदीय राजकारणात विजयाचा गुलाल पुन्हा उधळण्यासाठी पंकजा मुंडेंना तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. यापूर्वी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. त्यानंतर, भाजपने 2024 मध्ये त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. मात्र, तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अखेर, विधानपरिषदेच्या निवडणुकीतून त्या पुन्हा एकदा विधिमंडळ सभागृहात पोहोचल्या आहेत.