गोंदिया :- झीरो पोल योजनेंतर्गत कनेक्शन देण्यासाठी महावितरणच्या कालीमाती येथील सहायक अभियंत्याने १५ हजार रुपये जानेवारी २०२३ मध्ये घेतले. त्यानंतर प्रतिज्ञापत्र ऑनलाइन करण्पास सांगितले, महावितरण, महसूलची नाहरकत हे सर्वच करण्यास सांगितले. मात्र अद्यापही ना खांब लागले, ना मीटर लागले नसतानाही शेतकऱ्याला १६ हजार ३९० रुपयांचे बिल पाठविण्यात आले. आता तो सहायक अभियंता ती योजना बंद झाल्याचे सांगून आपले हात झटकत आहे. परिणामी तो शेतकरी संकटात आला आहे.
आमगाव तालुक्यातील कातुर्डी येथील प्रेमलाल अनंतराम बिसेन यांची शेती कातुर्ली गावात आहे. त्यांना महावितरणच्या एका कर्मचान्याने २०२३ मध्ये महाराष्ट्र कृषी धोरणाअंतर्गत झीरो पोल योजनेंतर्गत शेतात ट्रान्सफॉर्मर लावून मिळतो. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार प्रेमलाल बिसेन यांनी कालीमाती येथील महावितरणच्या उपकेंद्रात जाऊन सहायक अभियंता अनंत प्रसादकर यांची भेट घेतली. प्रसादकर यांनी त्यांना यासाठी १५ हजार रुपये लागतील असे सांगितले. शेतकरी बिसेन यांनी १५ हजार रुपये सहायक अभियंत्याला जानेवारी २०२३ मध्ये दिले. त्यानंतर झीरो डीपी अंतर्गत कनेक्शन मिळेल अशी हमी दिली. त्यासाठी प्रतिज्ञापत्र करून महावितरण आणि महसूल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले.