शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र,
सरकारनं शेतकऱ्याला कर्जमुक्ती करुन त्याचा सातबारा कोरा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. या मागणीसाठी सर्व शेतकरी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहणार आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुढाकार घेतला आहे. सरकारचं धोरण, डिझेल, खते किटकनाशके यांचा खर्च वाढत चालला आहे. यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
शेतीमालाचे भाव कमी होण्याचे कारण म्हणजे सरकारने घेतलेले निर्णय सरकारचे आयात निर्यातीचे धोरण. उदाहरणार्थ कांदा निर्यातीवर बंदी घातली कांद्याचे दर पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला. बाहेरच्या देशातून सोयाबीन पेंड व पामतेल आयात केल्याने सोयाबीनचे दर पडले. सोयाबीन उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला. दुध पावडर आयात केल्याने दुधाचे भाव कमी झाले आहेत. सरकारने मका आयात करु लागल्याने मक्याचे दर ढासळले आहेत. यामुळं मका उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. साखर निर्यातीवर बंदी घातल्याने प्रति टनास 800 रुपयाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याचे राजू शेट्टी म्हणाले.