चंद्रपूर 3 जुलै:- चंद्रपूर मनपाचे ५० वातानुकूलित ई-बसेस सुरू करण्याचे नियोजन असून ”पीएम ई-बस सेवे”चा प्रस्ताव केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे.
वीज केंद्र, कोळसा खाणी, सिमेंट व पोलाद उद्योगांमुळे चंद्रपूरला वायू व हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहन प्रदूषणाची मोठी भर पडली. परिणामी वातावरणातील जीवघेण्या घटकांमुळे विविध आजारांची तीव्रता वाढली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ”पीएम ई-बस सेवे”चा समावेश केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, चंद्रपूर महापालिकेनेही ई-बसेस चालविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. राज्य सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये ”पीएम ई-बस सेवा” या नावाने केंद्र- प्रायोजित योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना दोन श्रेणींमध्ये लागू केली जाईल. पहिल्या श्रेणीमध्ये शहर बससेवा व संबंधित पायाभूत सुविधा आणि दुसऱ्या श्रेणीत ”ग्रीन अर्बन मोबिलिटी इनिशिएटिव्ह”चा समावेश आहे. महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडे दोन टप्प्यांत ५० ई- बसेसचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास चंद्रपूरच्या विकासातील आमूलाग्र बदलाचा हाही एक महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास आयुक्त विपीन पालिवाल यांनी सांगितले.
आयुक्त विपीन पालिवाल यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून तयार झालेल्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास चंद्रपूरच्या विकासात मोठी भर पडणार आहे. डेपो बाधकाम, चार्जिंग स्टेशन व इतर सेवा केंद्र सरकारच्या निधीतून नागरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमाने उभारल्या जातील. केंद्र बसेस चालविण्यासाठी देखील अनुदान देत आहे अशीही पुष्टी त्यांनी जोडली.
होणारे प्रदूषण रोखण्यासोबत नागरिकांना होणार प्रवास स्वस्त – ३ लाखांच्या वर लोकसंख्या असणाऱ्या शहरात सदर ”पीएम ई-बस सेवा’ (‘PM E-Bus Service’) सुरु केली जात आहे. पहिल्या टप्यात ३० तर दुसऱ्या टप्यात २० बसेस सुरु करण्याचे नियोजन आहे. यामुळे शहरात असून स्थानिक चंद्रपूरवासीयांना शहरात प्रवास सोयीचा व स्वस्तात उपलब्ध होणार आहे.