दूषित पाण्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात..
नागपूर:- महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने वारंवार महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळशापातून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहे. परंतु त्याकडे आजही दुर्लक्ष होत आहे. खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राख पून्हा कन्हान नदीत आढळली. त्यामुळे पाणी दुषित झाल्याने नागपुरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
नागपूरसह परिसरात गेल्या एक- दोन दिवसांत पाऊस झाला. त्यामुळे कन्हान नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. १ जुलैच्या दुपारी कन्हान जल शुद्धीकरण केंद्राच्या (डब्लूटीपी) जलवसाहतीच्या विहिरीजवळ नदीत ओसीडब्लू कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख पडलेली आढळली. त्यामुळे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली.
राखेत किरणोत्सर्गाचेही प्रमाण नागपूरसह मध्य भारतातील कोळशात विविध संस्थांच्या तपासणीत किरणोत्सर्गाचे प्रमाण आढळले आहे. त्यामुळे हे किरणोत्सर्गाचे प्रमाण औष्णिक विद्युत केंद्रातील कोळशा जळल्यानंतर तयार होणाऱ्या राखेतही राहते. त्यामुळे ही राख मानवी शरीरात पाणी, श्वास अथवा इतर मार्गातून गेल्यास त्याच्या जीवाला धोका संभावत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणने आहे.