कशी असेल हुकुमी एक्क्यांची पुढची खेळी?
साधारणतः एखाद्या संघाचा स्पर्धेत पराभव झाला की विद्यमान गटातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती द्या, त्यांना निवृत्त करा अशा मागण्या होतात. अनेकदा हे खेळाडू स्वतः सुद्धा अशावेळी आपली निवृत्ती जाहीर करतात. पण यंदा टी २० विश्वचषकाच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात विश्वविजेत्या ठरलेल्या भारताने विजयानंतर आपले तीन हुकमी एक्के गमावले आहेत. कर्णधार रोहित शर्मा, सध्याच्या घडीचा सर्वात शक्तिशाली फलंदाज विराट कोहली व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने २०२४ च्या विश्वचषकानंतर टी २० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. टी २० मध्ये विराट- रोहित यापुढे दिसणार नाहीत हे सत्य पचवणं सध्या भारतीय क्रिकेटप्रेमींना कठीण जात आहे, याचबरोबर आता रोहित व विराट पुढे काय करणार हा एक प्रश्न अनेकांच्या मनात पिंगा घालतोय.
टी २० विश्वचषकात भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब होताच विराट कोहलीने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. “हे एक ओपन सिक्रेट आहे”, असं म्हणत कोहलीने यंदाचा वर्ल्डकप आपल्यासाठी शेवटचा होता असं जाहीर केलं. त्यापाठोपाठ तासाभरातच भारतीय चाहत्यांच्या आनंदाला पॉज लागेल अशी घोषणा कर्णधार रोहित शर्माने केली व आपण निवृत्त होत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. या दोघांच्या पाठोपाठ जडेजाने सुद्धा सोशल मीडियावर आपली निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला.