आणिबाणीवरून केली घणाघाती टीका
नवी दिल्ली 24 जून:- देशाच्या इतिहासात 25 जून हा काळा दिवस आहे. या दिवशी काँग्रेसने देशावर आणिबाणी लादून लोकशाहीच्या तोंडाला काळिमा फासल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी संसद भवनात भाषण करताना ते बोलत होते.
आणीबाणीच्या निमित्ताने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, 25 जून हा अविस्मरणीय दिवस आहे. त्या दिवशी आपल्या लोकशाहीचे तुकडे झाल्याचे मोदींनी म्हटले. देशातील जनतेला विरोधकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. विरोधक लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील आणि जनतेचे प्रश्न मांडतील, असा आम्हाला विश्वास आहे. उद्या 25 जून आहे. भारतीय संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी 25 जून हा दिवस अविस्मरणीय आहे. या दिवशी भारताच्या लोकशाहीला काळीमा फासला गेला आणि त्याला 50 वर्षे पूर्ण करत आहे. त्यावेळी भारताची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवीन पिढी विसरणार नाही. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली आणि देशच तुरुंगात बदलला. सुमारे 50 वर्षांपूर्वी जे केले होते ते भारतात पुन्हा कोणी करण्याची हिम्मत करू नये असा संकल्प आहे असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
जनतेविषयी आभार व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, जर आपल्या देशातील नागरिकांनी सलग तिसऱ्यांदा सरकारवर विश्वास ठेवला असेल तर याचा अर्थ त्यांनी सरकारच्या धोरणांना आणि हेतूंना मान्यता दिली आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, पण देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या संसदेत पहिल्यांदाच शपथविधी होणार आहे. आजचा दिवस अभिमानाचा आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. सुमारे 65 कोटी लोकांनी मतदानात भाग घेतला. ही निवडणूकही महत्त्वाची आहे कारण स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा सरकारची सेवा करण्याची संधी दिली आहे. ही संधी 60 वर्षांनंतर आल्याचे मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. यानंतर 28 जूनपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू होईल. त्याचवेळी पंतप्रधान 2 किंवा 3 जुलै रोजी चर्चेला उत्तर देतील. हे अधिवेशन 24 जून ते 3 जुलै या कालावधीत होणार आहे. या 10 दिवसांत एकूण 8 बैठका होणार आहेत.