एर्नाकुलम १४ जून:- कुवेतमधील आगीच्या घटनेतील ४५ भारतीयांचे पार्थिव घेऊन हवाई दलाच्या विशेष विमानाने कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहे, अशी माहिती हवाई दलाच्या अधिकार्यांनी दिली आहे. भारतीय हवाई दलाचे सुपर हर्क्युलस C130J हे मालवाहू विमान कुवेतमध्ये गुरुवारी रात्री रवाना करण्यात आले होते.
कुवेतच्या दक्षिण मंगफ येथे बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास अल मनगाफ नावाच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. मृतांपैकी तब्बल २३ जण केरळमधील आहेत. याशिवाय मृतांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. एबीटीसी या बांधकाम कंपनीनं ही इमारत आपल्या मजुरांच्या निवासासाठी भाड्याने घेतली होती. या ठिकाणी एकूण १९५ मजूर राहत होते.
ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत बहुतांश मजूर राहत होते. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे (Electric short circuit) इमारतीला आग लागली. लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरात भीषण आग लागली. आग लागल्याचे पाहून काही लोकांनी अपार्टमेंटमधून उड्या मारायला सुरुवात केली. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला, तर काही जणांचा आगीत होरपळून आणि धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह (Kirtivardhan Singh) हे तातडीने कुवेतला रवाना झाले. याठिकाणी पोहोचताच सिंह यांनी जखमी मजुरांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची नुकसान भरपाई पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आली आहे.