Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Takht of Delhi too :राखतो महाराष्ट्र माझा ; आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… राजा बढे यांच्या या ऊर्जस्वल ओळी. भाजपचा विचार केला तर यावेळी त्यानुसार घडले नाही. दिल्लीचे तख्त नरेंद्र मोदी यांनी राखलेे; पण महाराष्ट्राची साथ त्यांना गेल्यावेळेइतकी मिळाली नाही.लोकांनी महायुतीला ४१ वरून थेट १७ वर आणून ठेवले. पाच महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्रासारखे संपन्न राज्य आपल्याकडेच राहावे, असे दिल्लीश्वरांना नक्कीच वाटत असेल. त्यामुळे महाराष्ट्र खेचून आणण्यासाठी शिंदे-फडणवीस-अजित पवारांवर वरून भरपूर दबाव राहील. लोकसभेच्या पराभवाने महाराष्ट्रातील महायुतीची दिल्लीत कमी झालेली पत सुधारण्याची संधी विधानसभेला असेल. तूर्तास महाराष्ट्राचे दिल्लीतील वजन कमी झाले आहेच. नितीन गडकरींना आधीचेच खाते मिळाले, पीयूष गोयल यांचेही तसेच झाले. राज्यसभेवर होते तेव्हा गोयल महाराष्ट्राकडे पाहायचेही नाहीत, आता मुंबईतून निवडून गेले आहेत तेव्हा राज्यासाठी नाही; पण मुंबईसाठी तरी ते काही करतील अशी अपेक्षा आहे. निवडणुकीत त्यांनी आश्वासने तर खूप दिली होती. गडकरींना रस्ते, पुलांचे जाळे विणण्याची जबाबदारी दिली आहे, ती ते पूर्ण क्षमतेने निभावतात, महाराष्ट्रालाही आपल्या खात्यामार्फत त्यांनी भरभरून दिले. महाराष्ट्राच्या राजकारणात ते दखलअंदाजी देत नाहीत. आपण महाराष्ट्रात लक्ष द्यायला लागलो तर काहींच्या पोटात दुखेल हे त्यांना ठाऊक आहे. त्यांना केंद्रातून बाजूला करणे तितके सोपे बिलकुलच नव्हते म्हणून ते आहेत तिथे टिकून आहेत. आज दिल्लीत महाराष्ट्राचा दबावगट नाही. अर्थात मोदी-शहांसमोर असा दबाव चालत नव्हताच; पण आताची बदललेली परिस्थिती लक्षात घेता दबावाच्या राजकारणाला महत्त्व येईल. उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेशला झुकते माप दिले जात असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. महाराष्ट्राला (Maharashtra) केंद्राचा योग्य वाटा मिळावा म्हणून केंद्र आणि राज्यातील भाजपचे नेते खूप काही करू शकतात.

काही बदल तर अटळच : शिंदे-फडणवीस-अजित पवारांना ताकद देण्यासाठी नितीन गडकरींनी (Nitin Gadkari ) लक्ष घालावे, असे आज सांगितले तर त्याचा उद्यापासूनच फायदा होईल; पण भाजपमध्ये तसे होऊ शकत नाही. दिल्लीत बसून महाराष्ट्राचे पालकत्व गडकरी घेतील असे वाटत नाही. मुळात तशी त्यांची इच्छा नाही. त्यांच्या खात्यात ते खूश आहेत. अनेकजण विचारतात की, देवेंद्र फडणवीसांचे आता काय होईल? लोकसभा निवडणुकीत दिल्लीसह कोणी किती छळले ते फडणवीस सांगणार नाहीत, तोंड दाबून बुक्क्यांचा मार ते आधीही सहन करीत होतेच. तसा तो त्यांनी आजवर अनेक बाबतींत सहन केलेला आहेच. विनोद तावडेंना दिल्लीहून मुंबईत पाठविणार आहेत अशी चर्चा होती; पण आता ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अचानक फडणवीस तर राष्ट्रीय अध्यक्ष नाही होणार? काहीतरी मोठे बदल होतील हे नक्की आहे. बरेच काही वरखाली होईल. भाजपच्या कमी जागा आल्यामुळे आणि मित्रपक्षांच्या मदतीने सरकार चालवावे लागत असल्याने मोदी-शहांच्या निर्णय घेण्यावर काही मर्यादा आहेत.भाजपमध्ये त्यांचा शब्द अंतिम असल्याचे दिसते; पण अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक मोठी शक्ती आहेच. संघाची आता भाजपला गरज नाही म्हणणारे जे. पी. नड्डा यांचे भाजप अध्यक्षपद लगेच गेले. कोणी म्हणेल अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला म्हणून ते गेले. एवढे सोपे नाही ते. संघाशी पंगा काय असतो ते त्यांना कळले असेलच. भाजपला ज्या पद्धतीने फटके बसले, संघाची अवहेलना करण्यात आली आणि आता सरसंघचालक, ऑर्गनायझर ज्या कानपिचक्या देत आहेत ते सगळे पाहता भाजपच्या निर्णयांवर संघाचा कंट्रोल वाढेल. सरकारचे निर्णय मोदी, शाह-चंद्राबाबू-व्हाया नितीश तर भाजपचे निर्णय मोदी-शाह व्हाया संघ असेच होतील.

राज्यातील महायुतीचे तिघेही नेते निकालाच्या धक्क्यातून अद्याप बाहेर आलेले दिसत नाहीत. परवा सरकारी बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांची नाराजी आम्हाला भोवली म्हणून फटका बसला. हे एक कारण झाले. यादी खूप मोठी आहे, आभाळ फाटले आहे, पाच महिन्यांत खूप ठिगळं लावावी लागतील. भाजपचे नेते एकत्र बसून शुक्रवारी चिंतन करणार आहेत. अनेकांच्या मनात खदखद आहे, ती बाहेर येऊ शकते. अर्थात चंद्रशेखर बावनकुळेंनी लोकांना बोलू दिले तर. एकेका मतदारसंघातील आपसातील लाथाळ्यांच्या कहाण्या आता समोर येत आहेत. महायुती-भाजपमध्ये एकमेकांचा गेम करण्याचे प्रकार नंदुरबारपासून अमरावतीपर्यंत आणि जालन्यापासून भिवंडीपर्यंत घडले. ते प्रदेशाने आणि दिल्लीने गांभीर्याने मनावर घेतले तरच विधानसभेला बरी परिस्थिती राहील. अन्यथा लोकसभेचा शो विधानसभेला रिपीट होणे अटळ आहे. संघाने कान टोचले असले, तरी अजित पवारांशी केलेला घरोबा तोडतील असे वाटत नाही. विधानसभेसाठी त्यांची सोबत लागेलच. स्वत: पवारांनी काही वेगळा निर्णय घेतला तर भाग वेगळा.

जाता जाता :महाराष्ट्राचे एक कॅबिनेट मंत्री ‘वर्षा’ बंगल्यावर गेले.. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या केबिनमधून बाहेर पडले. ‘वर्षा’च्या आवारातील गाडीकडे जात होते. तेवढ्यात जरा हवा आली आणि बंगल्यातल्या झाडावरचे दोन-तीन आंबे पडले, तीन-चार आधीपासूनच पडलेले होते. या मंत्र्यांनी पडलेले आंबे उचलायला सुरुवात केली, पीएला म्हणाले, अरे! तुही उचल, मौका है उठाले. मग काय पडत्या आंब्याची आज्ञा. त्यानेही एक-दोन आंबे उचलले आणि दोघेही गाडीत बसून गेले. मुख्यमंत्र्यांच्या स्टाफमधील कर्मचारी चेष्टेने हसले. आंबे उचलण्याचा हा करार प्रासंगिक होता की नव्हता ते मात्र कळले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles