फुटलेल्या 8 आमदारांची काँग्रेसमधून हकालपट्टी होणार?
19 जुलैला होणार मोठा निर्णय
काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या 19 जुलै रोजी होणार असून त्यामध्ये फुटलेल्या आमदारांवर मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपाचा संदर्भातली ही बैठक असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या कार्यकारिणीची 19 जुलैला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून दिल्लीतून केसी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित राहणार आहेत.
—————
चार वर्षात एक देश एक परीक्षेवर 58 कोटींची उधळण
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी ‘खेळ’
केंद्र सरकारने 2020 मध्ये तरुणांसाठी एक देश, एक परीक्षा अशी व्यवस्था असल्याची घोषणा केली होती. या अंतर्गत, एकाधिक परीक्षांमध्ये बसण्याऐवजी, ते सामायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीसाठी पात्र होतील. याची जबाबदारी नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी (NRA) वर सोपवण्यात आली होती. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या 4 वर्षांत सुमारे 58 कोटी रुपये खर्च करूनही ही एजन्सी अद्याप एकही परीक्षा नीटपणे घेऊ शकलेली नसल्याचे समोर आलं आहे. यामुळे दरवर्षी 1.25 लाख सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या 2.5 कोटी बेरोजगारांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
—————–
अजित पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नाहीत?
राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्वाची बातमी… अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. अजित पवार यांच्या ऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची देखील चर्चा होत आहे. शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अजित पवार यांच्या जागेवर जय पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढली तर नवी राजकीय समिकरणं समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत युगेंद्र पवार विरूद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.
——————
नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात भीषण अपघात
कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना धडक
नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात रविवारी भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना कंटनेरने धडक दिली. या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वीकेंडमुळे कसारा घाटामध्ये आज वाहनांची मोठी गर्दी असल्याने पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
—————-
20 तारखेला पुन्हा उपोषण, त्याच दिवशी मोठी घोषणा; मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये समारोप
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. राज्य सरकारच्यावतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे 2 महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र, मनोज जरांगे यांनी 1 महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत सगेसोयरे आणि मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. जरांगे यांनी दिलेल्या मुदतीची वेळ आज संपत असून संभाजीनगरमधून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला याची आठवण करुन दिली आहे. तसेच, सरकारने काही तो निर्णय घ्यावा, अन्यथा 20 जुलैपासून आपण पुन्हा उपोषणलाा बसणार असल्याची घोषणाच त्यांनी केली. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे प्रतिनिधी द्यायचे की नाही, 288 जागांवर निवडणूक लढवायची की नाही, याबाबतची घोषणाही त्याच दिवशी करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.
—————
त्या आमदारांचा कायमचा निक्काल लागणार,
‘या’ दिवशी होणार मोठा फैसला
नुकतंच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत उमेदवार शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं उघड झालं. त्यामुळे क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांवर कारवाई होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच संदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. 19 जुलैला ही बैठक होणार आहे. या बैठकीत फुटलेल्या आमदारांबाबत महत्वाचा फैसला होऊ शकतो. दिल्लीतील महत्वाच्या नेत्यांसमोर या बाबतचा निर्णय होणार आहे. तसंच विधानसभेच्या जागावाटपावरदेखील चर्चा होणार आहे.
—————–
गद्दार आमदारांची ओळख पटलीय!
माजी गृहमंत्री स्पष्टच बोलले,
विधानपरिषदेची निवडणूकीत काँग्रेस पक्षाची काही मते फुटली असल्याचे समोर आले आहे. निवडणूक झाल्यानंतर आमची काही मतं फुटली असल्याचे खुद्द नाना पटोले यांनी मान्य केलं आहे. काँग्रेस पक्ष या फुटीर आमदारांचे विश्लेषण करत आहे. ज्या आमदारांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येक आमदाराला एक फॉरमॅट दिला होता. कोणत्या आमदाराने कुठल्या पक्षाला मतदान केलं आणि कुठल्या आमदाराने पक्षाविरोधात मतदान केलं, हे शंभर टक्के ओळखता आलं आहे. त्यामुळे अशा आमदारांची ओळख पटलेली असून काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.