वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा
33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात ‘क्लीन चीट’
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समोर आले आहे. परिणामी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने याबाबत आक्षेप घेत अनेक आरोप केले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवालात सांगण्यात आले आहे. सोबतच राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचेही समितीचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला असल्याचे समोर आले आहे.
——–
वीज कोसळून पूर्व विदर्भात पाच ठार
शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस
पूर्व विदर्भात म्हणजेच नागपूर विभागात सोमवारी वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यांत रोवणीदरम्यान वीज कोसळल्याने दोन महिला मजुरांचा तर, चिचटोला येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यांतील मोहपा येथे वीज कोसळून पती-पत्नी दगावले.
——-
VIP प्रमुखांच्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या
बिहारच्या राजकारणात एकच खळबळ
बिहारमधील विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. मुकेश साहनी यांच्या विडिलांचे नाव जितन साहनी आहे. ते 65 वर्षांचे होते. या धक्कादायक घटनेमुळे बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुकेश सहानी यांचा व्हीआयपी हा पक्ष सध्या इंडिया आघाडीसोबत आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. मिलालेल्या माहितीनुसार जितन साहनी यांची अज्ञाताने हत्या केली आहे. आज सकाळी (16 जुलै) दरभंगा येथील त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्राने हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
———
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
बस ट्रॅक्टरला आदळली
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. खासगी बसच्या या भीषण अपघातामध्ये पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर या बसमध्ये 54 प्रवासी होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेल जवळ ही खासगी बस एका ट्रॅक्टरला आदळली आणि थेट दरीत कोसळली. रात्री एक वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. अपघातात काही जण जखमी झाले असून त्या सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
——
नदीच्या पुरातून अंत्ययात्रा
हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग
देवनाळा नदीला पूर आला होता. या पुरामुळे यमुनाबाई यांचा अंत्यसंस्कार कसा करावा? असा प्रश्न सर्वांना पडला. शेवटी डोक्यावर तिरडी घेऊन नदीतून वाट काढत अंत्यसंस्कार करण्यात आला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात घडली. नदीवर पूल असता किंवा जोडमोहा गावात स्मशानभूमी असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.देशाला स्वातंत्र मिळून सात दशके लोटली आहे. परंतु अजून पायाभूत सुविधा सर्वत्र तयार झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात रस्ते अन् पूल नसल्याची विदारक परिस्थिती अधूनमधून समोर येत असते. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून जावे लागते. काही ठिकाणी बस नसल्यामुळे पाच-दहा किलोमीटर चिमुकल्यांचा प्रवास होता. आता विदर्भातून मन सून्न करणाऱ्या दोन बातम्या आल्या आहेत. मृत्यूनंतर शेवटचा प्रवास सुखकर झालेला नाही. मृत्यू झालेल्या ७५ वर्षीय महिलेच्या आप्तेष्टांना पुराच्या पाण्यातून वाट काढत त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला. ७५ वर्षीय महिलेचा शेवटचा प्रवासही मरणयातना सहन करणारा ठरला.
——–
प्रकाश आंबेडकर करणार आज मोठी घोषणा!
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) हे आज मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्विट करत त्यांनी माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का? राजकारणात या घोषणामुळे मोठी उलथापालट होणार का ? प्रश्नांना यामुळे उधाण आले आहे.
————-
भाजप सरकार चार महिन्यात गडगडणार
मोठ्या नेत्याचा दावा
नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. जयंत पाटील यांना 23 मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण करता न आल्याने त्यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांना मित्र पक्षांची मतेही मिळाली नाहीत. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यांतच बदलणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
———-
शासकीय विश्रामगृहात पोलिसांची टीम दाखल
वादग्रस्त IAS पूजा खेडकर प्रकरण
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चालला आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा, महाराष्ट्र शासनची पाटी आणि स्वतंत्र केबिनची मागणी इथपासून सुरु झालेल्या प्रकरणात इतके मोठे टर्न ट्वीस्ट येतील याचा कदाचित पूजा यांनीदेखील विचार केला नसावा. वादात सापडल्यानंतर पूजा यांची पुण्यातून थेट वाशिममध्ये बदली करण्यात आली. दरम्यानच्या काळात पूजा आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित अनेक प्रकरणे उजेडात आली. त्यामुळे खेडकर कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान आता पूजा खेडकर राहत असलेल्या वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात पोलिसांची टीम दाखल झाली आहे