राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाचा खळबळजनक आरोप
राज्याच्या कृषी विभागात 118 कोटी 86 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रणित भारतीय किसान संघाने केला आहे. कृषी विभागांतर्गत काम करणाऱ्या कृषी उद्योग विकास महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळाने शेतकऱ्यांना डीबीटी च्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, मेटलडिहाईड आणि नॅनो युरिया या चार वस्तू कंत्राटदारांकडून खरेदी करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बाजारातील प्रचलित दराच्या तुलनेत दुप्पट ते चौपट दर देऊन ह्या वस्तू खरेदी करत कंत्राटदारांची खिसे भरले असून आता त्या दर्जाहीन वस्तू शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातील, असा आरोप ही भारतीय किसान संघाचे नेते नाना आखरे यांनी केला आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी कृषी विभागाने 325 कोटींची योजना आखली होती. त्या योजनेत शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, मेटलडीहाईड कीटकनाशक, नॅनो युरिया या चार वस्तूसाठी डीबीटी पद्धतीने रोख रक्कम द्यायची होती. मात्र कृषी विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना डीबीटीतून रोख रक्कम देण्याऐवजी बाजारातून वस्तू खरेदी करून देण्याचा घाट घातला आणि कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी बाजार भावाच्या दुप्पट ते सहा पट दर देऊन सरकारचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.