छत्रपती शिवाजी महाराज राजकीय विषय नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
मालवणची घटना दुर्दैवी आहे. विरोधकांनी अनेक विषयावर राजकारण करावे. छत्रपती शिवाजी महाराज राजकीय विषय नाही. ते आमचे श्रद्धास्थान आहे. विरोधकांनी राजकारण करू नये, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नांदगाव येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते
___
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार?
मानधनाचं आश्वासनं पूर्ण न केल्यानं नाराजी
नागपूर शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. या कामात आशा सेविकांची जबाबदारी जास्त असताना लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. त्यामुळं आशा सेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा आशा सेविकांनी दिला आहे.
___
20 रुपयाच्या वडापावसाठी 14 लाखांचं सोनं गमावलं
पुण्यातील धक्कादायक घटना
पुण्यात (Pune) एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं. ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. या पिशवीत 195 ग्रॅम सोन होतं, ज्याची किंमत जवळपास 14 लाख आहे. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
___
रायगड हादरलं
अल्पवयीन मुलावर दोघांकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
रायगडमध्ये एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे यातील आरोपीदेखील 2 अल्पवयीन मुले आहेत. माणगावच्या जावळी येथील मागासवर्गीय निवासी शाळेतून हा गंभीर प्रकार समोर आलाय. इतक्या लहान वयात लैंगित अत्याचार करण्यापर्यंतचे विचार मुलांच्या मनात येतात कसे? ही घटना घडेपर्यंत शिक्षक, इतर कर्मचारी कुठे असतात? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतायत. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आपल्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार पीडित विद्यार्थ्याने शिक्षकांना सांगितला.यानंतर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तीनही मुलांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
__
रामदास आठवले उद्या राजकोट किल्ल्याला देणार भेट
पुतळा कोसळलेल्या दुर्घटना स्थळाची पाहणी करणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून अजूनही राजकीय वातावरण तापले आहे. 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र अवघ्या 8 महिन्यांमध्ये हा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये अनेक मतभेद सुरु आहेत. एकमेंकावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत.
__
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी,
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी आज वाढवण येथील बंदराचे भूमिपुजन केलं. यावेळी बोलताना त्यांनी सिंधुदुर्गयेथील घटनेवरही प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही झालं, ते अत्यंत दुख:द आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो, असे ते म्हणाले.